ETV Bharat / state

राज्यात वादळी पावसाचा हाहाकार; भाजपासह प्रहारचं कार्यालय उडालं, जनावरंही दगावली - Heavy Rain

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 4:17 PM IST

Updated : Apr 13, 2024, 6:53 PM IST

Heavy Rain Affected BJP Prachar Office
राज्यात वादळी पावसाचा हाहाकार

Heavy Rain Affected BJP Prachar Office : राज्यात अवकाळी पाऊस कोसळून मोठं नुकसान झालं. अमरावतीत भाजपासह प्रहारचं निवडणूक कार्यालय उडून गेलं. या कार्यालयात पाणी घुसल्यानं राजकीय पुढाऱ्यांच्या अपेक्षांवरही पाणी फिरणार की काय अशी चर्चा आता परिसरात करण्यात आहे. तर, अवकाळीमुळं जालन्यात 14 जनावरं दगावल्याची घटना घडली.

राज्यात वादळी पावसाचा हाहाकार

अमरावती/जालना Heavy Rain Affected BJP Prachar Office : शनिवारी पहाटे राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. या वादळी पावसात कुठं शाळेचं छत उडालं, तर कुठं भाजपा आणि प्रहारचं कार्यालय उडाल्यानं मोठा हाहाकार दिसून आला. अमरावती शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला. या पावसामुळं अमरावती शहरातील आयर्वीन चौक, खापर्डे बगीचा रेल्वेस्थानक या परिसरात मोठ्या संख्येनं झाडं कोलमडून पडली असून विजेचं खांबही कोसळले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात असणारं भाजपाचं मुख्य कार्यालय तसेच खापर्डे बगीचा परिसरात असणारं प्रहारचं प्रचार कार्यालय देखील या वादळात पूर्णतः उद्ध्वस्त झालं. तर जालन्यात वादळी पावसात 14 जनावरं दगावली आहेत.

छत्रपती शिवरायांचा पुतळा असणारी ट्रॉली उलटली : कापडणे बगीच्या परिसरात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचार कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा विराजमान असणारी ट्रॉली या वादळामुळं उलटली. या ट्रॉलीखाली दुचाकीचं नुकसान झालं. प्रचार कार्यालयाचा मंडप देखील उडाला असून प्रचार कार्यालय पूर्णतः विस्कळीत झालं आहे.

भाजपाचं प्रचार कार्यालय उद्ध्वस्त : भाजपाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचं अमरावती रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात आलेलं भव्य प्रचार कार्यालय वादळी पावसात पूर्णतः उद्ध्वस्त झालं. भाजपाच्या प्रचार कार्यालयासमोरील रेल्वेच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांचे कट आउट देखील अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. इर्विन चौक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले अनेक कापडी स्टॉल देखील या वादळात उडून गेले.

खापर्डे बगीचा परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद : शहरातील खापर्डे बगीचा परिसरात जाणारे सर्व पाचही रस्ते झाडं आणि विजेचे खांब पडल्यामुळं बंद झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून खापर्डे बगीचाकडे जाणाऱ्या मार्गावर झाडं उलमडून पडली. तसंच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून खापर्डे बगीचा परिसरात जाणारा मार्ग देखील विजेचे खांब कोसळल्यामुळं बंद झाला. रेल्वे स्थानकाकडून खापर्डे बगीचाकडं जाणाऱ्या मार्गावर देखील अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळं या परिसरात पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प होती.

अनेक शाळांना सुट्टी : शहरातील होली क्रॉस, आदर्श शाळा यासह अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली. खापर्डे बगीचा परिसरातील आदर्श माध्यमिक शाळेच्या भिंतीवर भलं मोठं झाड कोसळलं. शाळेला असणाऱ्या दोन्ही बाजूंच्या मार्गांवर झाडं कोसळल्यामुळं शाळेत जाण्याचा रस्ता बंद झाला. झाडांबरोबरच शाळेलगत विजेचे खांब देखील कोसळले आहेत. आज सकाळी साडेसात वाजता विद्यार्थी शाळेकडं आले असताना शाळेतील शिक्षकांनी त्यांना परत घरी जाण्यास सांगितलं. शाळेतील शिक्षक देखील बराच वेळपर्यंत शाळेबाहेरच उभे होते.

रेल्वे स्थानकावरील राष्ट्रध्वज काढले : वादळी पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरात फडकवण्यात आलेले भले मोठे राष्ट्रध्वज काहीसे वाकले होते. विजेच्या उपकरणाद्वारे राष्ट्रध्वज फडकविला जातो आणि खाली उतरविला जातो. रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचं काम खोळंबल्यामुळे या परिसरात पहाटेपासून वीजपुरवठा खंडित होता. वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर सकाळी साडेनऊ वाजता पॅलेस स्थानक परिसरातील राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला. त्यानंतर नवा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा हाहाकार : अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून वादळी पावसाचा हाहाकार सुरू आहे. चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील चांदूरबाजार, भातकुली तालुक्यात वादळी पावसामुळं शेतातील गव्हाच्या प्रचंड नुकसान झालं. गव्हासोबतच आंब्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

महापालिका प्रशासन सतर्क : अमरावती शहरातील विविध भागात झालेलं नुकसान पाहता, अमरावती महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच ज्या ज्या भागात झाडं कोसळली आहेत, ती झाडं कापून रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम केलं जात आहे.

जिल्ह्यात येलो अलर्ट : हवामान विभागानं अमरावती जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 36 तासात जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

जालना जिल्ह्यात वीज पडून 14 जनावरांचा मृत्यू : जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा कहर पाहायला मिळाला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनेत वीज पडून 14 जनावरं दगावल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून जिल्ह्यात सलग वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे. त्यामुळं शेती पिकांचं नुकसान झालय. तर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या घटनेत 14 जनावरं दगावली. यात भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा, पळसखेड पिंपळे, आव्हाना, पळसखेड ठोंबरे, कोपर्डा आणि तपोवन तांडा येथील पशुधनाचा यात समावेश आहे. तर जाफराबादेत एक बैल दगावला असून आव्हाना इथं चार शेळ्यांचा मृत्यू झाला. तर अंबड तालुक्यातील चर्मापुरीत वीज पडून एक म्हैस दगावली.

हेही वाचा :

  1. नंदुरबारमध्ये वादळी पाऊस! वीज कोसळून तरुणीचा मृत्यू, तर कोट्यवधींची मिरची पाण्यात
  2. Monsoon Update : पुढील 24 तासात उत्तरेकडे सरकणार बिपोरजॉय चक्रीवादळ; या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता
  3. Rain In Thane : भिवंडी ग्रामीण भागात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचे तांडव; घरांसह झाडांची पडझड
Last Updated :Apr 13, 2024, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.