ETV Bharat / politics

"पालघर जिल्ह्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण निवडणुकीसाठी ...", हितेंद्र ठाकूर यांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप - Hitendra Thakur

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 9:58 AM IST

Hitendra Thakur Press Conference : पालघर लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार असून यावरुन आता जिल्ह्यात वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरुद्ध महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

Hitendra Thakur, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray
हितेंद्र ठाकूर , देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे (Etv Bharat)

हितेंद्र ठाकूर पत्रकार परिषद (reporter)

पालघर Hitendra Thakur Press Conference : पालघर लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नेत्यांच्या सभेत आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पालघर लोकसभेचा प्रचार सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेलाच पत्रकार परिषद घेत हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले हितेंद्र ठाकूर? : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'हितेंद्र ठाकूर हे बेडकाचा फुगलेला बैल असून वसईत त्यांना निपटून टाकू', असं म्हटलं होतं. यावर बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, "कुणाच्या बापाची हिंमत आहे, आम्हाला निपटून टाकण्याची? त्यांनाच पालघर जिल्ह्यातून निपटून टाकतो. खरंतर लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करायला हवा. चांगली भाषा वापरायला हवी. परंतु हे काय बैल, बेडूक, मेंढरं असे शब्द वापरतात. ते मला बैल म्हणाले, पण मी तर बैलासारखा दिसत नाही. तसंच जे माझ्याबद्दल बोलले, त्यांनी अगोदर ते स्वत: कसे दिसतात, याचं अवलोकन करावं", असा टोला ठाकूर यांनी लगावला.

कोट्यवधी रुपये वसुलीचा धंदा : पुढं ते म्हणाले की, "पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, तलाठी, अंगणवाडी सेविका, ठेकेदार तसंच अन्य सर्व सरकारी कर्मचारी भाजपाच्या प्रचाराला जुंपलेत. अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्यात भाजपाचं चिन्ह लावल्यामुळं अंगणवाडी सेविकेची नोकरी जाता जाता वाचली. पालघर जिल्ह्याचं वाटोळं झालं तरी चालेल, येथे रस्ते, वीज, पाणी वा अन्य कोणतेही प्रश्न सुटले नाहीत तरी चालतील. परंतु निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये जमा करण्यावर पालकमंत्र्यांचा भर आहे." तसंच ठेकेदार अधिकाऱ्यांकडून वीस-वीस कोटी रुपये मागितले जात असल्याला गंभीर आरोपही यावेळी ठाकूर यांनी केला.

वसूल केलेल्या पैशाचे काय करणार? : कामं न करता बिलं काढण्याची खात्री भाजपाचे लोक देत आहेत. पालकमंत्री अधिकाऱ्यांना एका ठिकाणी बोलवून त्यांच्याकडून पैसे मागतात, असा आरोप ठाकूर यांनी केला. तसंच बैठका झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही तपासण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

ठाकरे यांचा ढोंगीपणा : वाढवण बंदराला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असलेल्या विरोधाकडं लक्ष वेधत ठाकूर म्हणाले की, उद्धव ठाकरे हे ढोंगी आहेत. ते मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव पर्यावरण मंत्री आणि सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना त्यांनी वाढवण बंदर रद्द का केलं नाही? उलट त्यावेळी तर ते वाढवण बंदरासाठी साडे सोळा हजार कोटी रुपये आल्याचं सांगत होते. ते कशाच्या आधारावर?", असा सवाल त्यांनी केला.

खोटे बोलण्याची हद्द : "हिंमत असेल तर माणुसकीनं निवडणूक लढवा, फसवणुकीनं नाही. कोणाला कोण निपटतो?, हे पाहतो. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. आम्हाला अडवण्यासाठी लोकांना त्रास का देता? असा सवालही त्यांनी केला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारशे एमएलडी पाणी दिलं असं सांगितलं. पण हे पाणी कुणाला दिलं? खोटं बोलण्याची हद्द झाली, असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. केतन तिरोडकर यांना अटक ; ड्रग्ज माफियांवरुन देवेंद्र फडणवीसांवर केले होते गंभीर आरोप - Ketan Tirodkar Arrested
  2. "राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कौरव सैन्य, त्यांच्या आघाडीची..."देवेंद्र फडवणीस यांचा इंडिया आघाडीवर निशाणा - Devedra Fadnavis on INDIA Bloc
  3. "मुंबई लुटणार्‍या घोटाळेखोरांना...", देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी - Devendra Fadnavis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.