ETV Bharat / state

"राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कौरव सैन्य, त्यांच्या आघाडीची..."देवेंद्र फडवणीस यांचा इंडिया आघाडीवर निशाणा - Devedra Fadnavis on INDIA Bloc

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 8:35 AM IST

Updated : May 15, 2024, 8:42 AM IST

Palghar Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत पांडव सैन्याला विजयी करत कौरव सैन्याला धूळ चारावी असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ते मंगळवारी पालघर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा याच्या प्रचार सभेत बोलत होते.

DCM Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडवणीस (Reporter ETV Bharat)

पालघर Palghar Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणूक कौरव-पांडवातील युद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष पांडवाची भूमिका बजावत आहेत. तसंच विरोधी इंडिया आघाडीमध्ये कौरव सैन्य असून त्यांचा पराभव करण्यासाठी पांडव सेैन्याला मदत करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

विरोधकांची खिचडी : सभेत बोलताना फडणवीसांनी खासदार संजय राऊत यांची तुलना ‘पोपटलाल’ अशी केली. ते म्हणाले, निवडणूक ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा अन्य संस्थांची नाही. तर ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी आहे. देशाला सुरक्षित कोण ठेवेल, सामान्यांच्या आशा-आकांक्षा कोण पूर्ण करेल, हे ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे. महाभारतातील युद्धाप्रमाणे हे लोकसभेचे युद्ध आहे. एकीकडं मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले आदींची फळी आहे, तर दुसरीकडं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कौरव सैन्य असून त्यांच्या आघाडीची खिचडी झाली आहे.

पंतप्रधानपदासाठी संगीत खुर्ची : विरोधकांना पंतप्रधानापदाचा उमेदवार ठरवता आलेला नाही. संगीत खुर्चीप्रमाणे पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा खेळ करण्याचा त्यांचा प्रयत्न मतदारांनी हाणून पडला पाहिजे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विकासाची ट्रेन धावतेय. मोदींच्या इंजिनाला अनेक डबे असून त्यात आदिवासी, अल्पसंख्यांक अशा सर्व घटकांना सामावून घेण्याची ताकद आहे. विरोधकांकडं केवळ इंजिनच असून त्यांच्या इंजिनाला डबेच नसल्यामुळं सामान्यांना तिथं स्थान नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनात फक्त त्यांच्या कुटुंबांना जागा असून सामान्य परिवारासाठी स्थान नाही. या वेळी फडणवीस यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा नामोल्लेख टाळून बहुजन विकास आघाडी म्हणजे काही सिंह नव्हे, अशी टीका केली.

कोटीच्या कोटी उड्डाणे : गेल्या दहा वर्षात मोदी यांनी काय काय केलं, याचा पाढा वाचताना फडणवीस म्हणाले, की "मोदींनी जगात चमत्कार करून दाखवला. गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढलं. वीस कोटी लोकांना स्वतःचं घर दिलं. पन्नास कोटी लोकांना गॅस दिला. ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. 65 कोटी युवकांना विनातारण कर्ज दिलं. आता या कर्जाची मर्यादा वीस लाख रुपये करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगार दिले. ऐंशी लाख बचत गट स्थापन केले. दहा कोटी महिलांना मदत केली. आता महिलांना लखपती करण्याचं धोरण घेतलं आहे. याशिवाय पुढच्या निवडणुकीत 33 टक्के जागा विधानसभा, संसदेत महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे."

बारा बलुतेदारासाठी 14 हजार कोटी : "आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारनं बारा बलुतेदाराचा विचार केला नव्हता. मोदी यांनी हा विचार करून त्यांच्यासाठी 14 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यांना वेगवेगळ्या कौशल्य प्रशिक्षण योजनांचा फायदा करून दिला. अनुसूचित जातीसाठी 24 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांसाठी दिले. मच्छीमारांसाठी जेटी, बोटी आदींची सुविधा केली. पारंपारिक मासेमारांचं पुनर्वसन करण्यावर भर दिला. सत्तर वर्षांच्या वृद्धांना मोफत उपचाराची सोय केली. ‘आयुष्यमान भारत’चा देशभर विस्तार केला, असं सांगताना फडणवीस यांनी तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना मोदींनी आणल्याचं सांगितलं."

पाकला धडा शिकवला : "मागच्या काळात आपण किनारपट्टीसाठी ‘सीआरझेड’चे नियम निश्चित केले असून डहाणूचे सौंदर्य आणि तेथील पर्यावरणाशी कोणतीही तडतोड न करता विकास करण्याची योजना आखली आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. बॉम्बस्फोट सुरू होते. त्या वेळी पंतप्रधानांसह सरकार अस्वस्थ होते. मोदी यांनी मात्र पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवला. गेल्या दहा वर्षात त्यांची आपल्याकडं डोळेवर करून पाहण्याची हिंमत झाली नाही," असे गृहमंत्र्यांनी सांगितलं.

गावितांचा राज्यात फायदा : खासदार गावित यांचं काम अतिशय चांगलं होतं. परंतु त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करून त्यांचा फायदा घेण्याचं भारतीय जनता पक्षानं ठरवलं आहे. त्याला त्यांनी मान्यता दिली असून त्यांचं योग्य ते पुनर्वसन करण्याची ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उमेदवार डॉ. हेमंत सवरा, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद भाई ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आणि आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का :

  1. पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये रोड 'शो', मुंबईत 'या' मार्गांवरील वाहतूक राहणार बंद - Narendra Modi road show in Mumbai
  2. जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का?...; प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी - आनंद दवे - Anand Dave On Praful Patel
  3. मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा मैदानात उतरणार...; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार - Maratha Reservation
Last Updated :May 15, 2024, 8:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.