ETV Bharat / politics

संजय निरुपम लोकसभा निवडणुकीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत; चैत्र नवरात्रीला करणार पुढील राजकीय प्रवासाची घोषणा - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 9:35 PM IST

Lok Sabha Election 2024 : संजय निरुपम (Sanjay Nirupam) हे काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ते पक्षाचे काम करत होते. या लोकसभा निवडणुकीत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या जागेवर अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित करून संजय निरुपम यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.

Lok Sabha Election 2024
संजय निरुपम

प्रतिक्रिया देताना माजी काँग्रेस नेते जय निरुपम

मुंबई Lok Sabha Election 2024 : पक्षाविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षानं ६ वर्षासाठी संजय निरुपम यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. संजय निरुपम (Sanjay Nirupam) हे आपल्या नवीन राजकीय प्रवासासाठी राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई उत्तर-पश्चिम या लोकसभा संघातून निवडणूक लढवायची आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस पक्षाला सोडली जाईल आणि त्या जागेवर आपण उमेदवार असू अशी शक्यता संजय निरुपम यांना होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी या जागेवर अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित करून संजय निरुपम यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. त्यानंतर संजय राऊत यांच्या मनातील खदखद बाहेर आली आणि त्याचा स्फोट होऊन शेवटी काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर ६ वर्षासाठी बडतर्फाची कारवाई केली. आता संजय निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वात जास्त एकनाथ शिंदे गट हा मजबूत पर्याय आहे. परंतु तिथेही त्यांच्याबाबत संभ्रमाचं वातावरण असल्यानं संजय निरुपम उद्यापासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) आपला निर्णय घेणार आहेत.


निवडणूक लढविण्यासाठी फार पूर्वीपासून तयारी : संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी फार पूर्वीपासून तयारी केली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटासोबत गेले. परंतु त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबतच एकनिष्ठ राहिले. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाईल. काँग्रेसकडून आपणाला मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची पूर्ण संधी भेटेल असा आत्मविश्वास संजय निरुपम यांना होता. त्या पद्धतीची मागणी त्यांनी पक्षाकडं केली होती. सुरुवातीला पक्षानेही त्याच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचंही संजय निरुपम यांनी सांगितलंय.

६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केली. ज्यावरून संजय निरुपम यांचा पूर्ण हिरामोड झाला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच नाही तर काँग्रेस पक्षावरही टीका केली. शेवटी काँग्रेस पक्षानं संजय निरुपम यांची ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली. विशेष म्हणजे ही हकालपट्टी करण्यापूर्वी त्यांना कुठल्याही पद्धतीची कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली नाही. आता संजय निरुपम हे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबरोबर काँग्रेसवर सुद्धा आरोप करत आहेत. परंतु हे आरोप म्हणजे निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केल्यामुळं ते अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, असं काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.



संजय निरुपम यांच्याबाबत शिंदे गटात दोन मतप्रवाह : संजय निरुपम यांच्यासोबत उत्तर भारतीय मतांचा मोठा कोटा आहे. अनेक वर्षापूर्वी संजय निरुपम यांनी मुंबईत जुहू चौपाटीवर छठ पूजेच्या निमित्तानं अस्मितेचं नवं राजकारण सुरू केलं. इथे दरवर्षी छठ पूजेच्या निमित्तानं मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईत उत्तर भारतीयांना नवीन ओळख मिळवून देण्याचं काम संजय निरुपम यांनी केलं. मुंबई उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणामध्ये असून त्याचा फायदा निवडणुकीत संजय निरुपम यांच्या नावानं काँग्रेस पक्षाला होत होता. परंतु आता संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर ते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाच्या शोधात आहेत. अशात एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यास ते या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याचं कारण विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. अशा परिस्थितीमध्ये संजय निरुपम यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यास ते त्यांना उमेदवारी देतील का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण संजय निरुपम यांच्या पक्ष प्रवेशासाठी सुद्धा एकनाथ शिंदे गटात दोन मतप्रवाह आहेत.


गोविंदाच्या नावाला विरोध : काही दिवसापूर्वी माजी खासदार, अभिनेता गोविंदा अहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. गोविंद यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशानंतर त्यांना मुंबई उत्तर पश्चिम या जागेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली गेली. परंतु भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचा गोविंदा यांच्या नावाला कडाडून विरोध आहे. तसेच गोविंदा अहुजा यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास पाहिला तर ते या मतदारसंघातून निवडणूक लढले तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो असा एक सर्वे समोर आलाय. या कारणानं गोविंदा यांचं नाव मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून सध्या वगळण्यात आलंय. अशा परिस्थितीमध्ये संजय निरुपम यांना जर शिंदे गटानं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तिकीट देण्याची हमी दिली तरच ते शिंदे गटात प्रवेश करतील. २०१९ च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना ५,७०,०६३ मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले संजय निरुपम यांना ३,०९,७३५ मत मिळाली होती. म्हणजेच गजानन कीर्तिकर हे २,६०,३२८ इतक्या मतांनी विजयी झाले होते.



नवरात्रीत घेणार निर्णय : महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप पूर्णतः सुटलेला नाही. तीन ते चार जागांवर अजूनही मतभेद सुरु आहेत. अशात मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघावरील दावा शिंदे गटाने सोडल्यास या जागेवर भाजपाकडून कमळाच्या चिन्हावर उमेदवार दिला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं हिरवा कंदील दिल्यास संजय निरुपम हे भाजपामध्ये प्रवेश करून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याकरताच मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास फार आग्रही असलेले संजय निरुपम निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. अशातच त्यांनी ९ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीचं कारण पुढे करत या नवरात्रीमध्ये ते आपली पुढील राजकीय भूमिका घोषित करतील असं सांगितलंय.

हेही वाचा -

  1. "मतदान करणार पण महिलांना हवीय समस्यांची सोडवणूक"; नीलम गोऱ्हे Exclusive ऑन 'ईटीव्ही भारत' - Lok Sabha Election 2024
  2. वाघांच्या भूमीत पंतप्रधान मोदींचा आवाज, जाणून घ्या भाजपासाठी का महत्वाची आहे चंद्रपूर लोकसभा - Lok Sabha Election 2024
  3. काँग्रेसला दिली कारल्याची उपमा, तर नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंनाही डिवचलं; चंद्रपूरच्या सभेत मोदींची चौफेर फटकेबाजी - PM Narendra Modi Chandrapur Sabha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.