पालघर - वसई विरार महापालिकेच्या वर्षभरापासून बंद पडलेल्या परिवहन सेवेचा उद्घाटन सोहोळा राजकीय श्रेय वादविवादानंतर आज दुपारी वसई पूर्वेकडील वसंत नगरी मैदानात पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन सेवेच्या बसचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा - अविनाश जाधव व पोलीस अधिकाऱ्यात बाचाबाची
बहुजन विकास आघाडीतर्फे १ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर राजकीय पक्षाला श्रेय जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून आज अधिकृतरित्या नवीन बसेसचे उद्घाटन करण्यात आले.
अशी आहे पालिकेची परिवहन सेवा..
पालिकेच्या परिवहन सेवेमध्ये ९१ बसेस दाखल झाल्या असून उर्वरित ५९ बसेस लवकरच मागविल्या जाणार आहेत. परिवहन सेवेचा नवा ठेका मेसर्स एस.एन.एन या ठेकेदाराला देण्यात आला आहे. नव्या बस या आधुनिक स्वरुपाच्या असून त्यात जीपीआरएस, तसेच प्रवाशांसाठी वायफायची सुविधा, अंध, अपंग, कॅन्सर पीडित रुग्ण, विद्यार्थी यांना बस प्रवासासाठी विशेष सवलत या सेवेतून मिळणार आहे.
नागरिकांना दिलासा
मागिल काही महिन्यांपासून पालिकेची परिवहन सेवा बंद होती. त्यामुळे, कामगार वर्ग व इतर नागरिकांना प्रवासासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. तर, दुसरीकडे खासगी वाहनचालकांकडून प्रवास करताना नागरिकांना अतिरिक्त पैसेही मोजावे लागत होते. परंतु, येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उद्घाटन सोहोळ्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र फाटक, मनपा आयुक्त गंगाथरन डी, भाजपचे राजन नाईक, काँग्रेसचे ओनिल अल्मेडा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई द्या-खासदार कपिल पाटील