महाराष्ट्र

maharashtra

खासदार निधी पूर्ण न वापरणाऱ्या उमेदवाराला लोक परत पाठवतील - यामिनी जाधव - Yamini Jadhav Claims

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 9:28 PM IST

Yamini Jadhav Claims : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असलेल्या यामिनी जाधव यांनी आपणच निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. तर या मतदारसंघातून विद्यमान खासदाराने खासदार निधीसुद्धा वापरला नाही. अशा खासदाराला मतदार परत पाठवतील असा विश्वास ई टीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.

Yamini Jadhav Claims
यामिनी जाधव (Reporter)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीविषयी माहिती देताना यामिनी जाधव (Reporter)

मुंबईYamini Jadhav Claims:दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतो आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव या विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आमदार विरुद्ध खासदार असा सामना रंगतो आहे. या संदर्भात प्रचाराला बाहेर पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, हा मतदारसंघ माझ्यासाठी नवा नाही. कारण मी वरळी येथे जन्माला आली आहे. याच भागात माझं बालपण गेलं आहे. त्यामुळे मला या मतदारसंघाची पूर्ण जाणीव आहे. मतदार संघातील सर्व समस्या, कोळीवाड्यांच्या समस्या आणि त्यांच्या उपजीविके संदर्भातल्या गोष्टी याची मला जवळून माहिती आहे. त्यादृष्टीने मी खासदार होताच पाण्यातून फिरणार आहे, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दलित आणि अल्पसंख्याक मते माझ्यामागेच :मी स्वतः दलित समाजातून पुढे आलेली एक मुलगी आहे. त्यामुळे सर्व समाज हा माझ्यामागे आपली लेक म्हणून निश्चित उभा राहील. त्याच सोबत भायखळा विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुतांश मतदार हे अल्पसंख्याक मतदार आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी या मतदारसंघात मी अनेक कामे केली आहेत. त्यामुळे हा सर्व मतदार माझ्या सोबत राहील याची मला पूर्ण खात्री आहे, असं त्या म्हणाल्या.

आमचीच शिवसेना खरी :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना असली विरुद्ध नकली असा संघर्ष आहे. बाळासाहेबांचे विचार आणि न्यायालयाने दिलेले निर्णय यानुसार आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. या शिवसेने सोबतच स्थानिक मतदारसुद्धा जोडला गेलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आमचा विजय हा अतिशय चांगल्या मतांनी होईल असा दावा त्यांनी केला. तर इथल्या विद्यमान खासदाराने गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्याकडे असलेल्या खासदार निधीचाही योग्य वापर केलेला नाही. त्यांचा 95% खासदार निधी हा परत गेला आहे. त्यामुळे अशा उमेदवाराला जनता आता परत घरी पाठवणार असा दावा यामिनी जाधव यांनी केला.


भ्रष्टाचाराचे केवळ आरोप :यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर मुंबई महानगरपालिकेतील अनेक भ्रष्टाचारांचे आरोप आहेत. या संदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, हे केवळ आरोप करण्यात आलेले आहेत. यापैकी एकाही आरोपांमध्ये तथ्य नाही. एकही आरोप सिद्ध झालेला नाही आणि होऊ शकणार नाही. ईडी किंवा आयकर विभागाने केवळ आमची चौकशी केली. चौकशी करणे म्हणजे आरोप सिद्ध होणे नाही. त्यामुळे केवळ आमची प्रतिमा मलीन करण्यासाठी आता विरोधक या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं भांडवल करत आहे; मात्र जनता त्याला फसणार नाही आणि विजय आमचाच होईल, असं त्यांनी पुन्हा एकदा त्यांनी ठासून सांगितलं.

हेही वाचा :

  1. २६/११ संदर्भात विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य निराधार, उज्ज्वल निकम यांचा दावा, 'गोबेल्स प्रचार' असल्याचा केला आरोप - Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar
  2. "वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्ज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा", कोणी केली मागणी? - Hemant Karkare assassination
  3. नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाकरेंच्या भाषणामुळं मत परिवर्तन होईल? - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details