मुंबई -वानखेडे प्रकरणावरून सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी संपूर्ण प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे ओढून घेतला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम कदम, नारायण राणे, त्यांचे दोन्ही सुपुत्र, चित्रा वाघ महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोपांची राळ उठवत होते. परंतु, आघाडीचे नेते जोरदार प्रत्युत्तर देत नव्हते. आता समीर वानखेडे प्रकरणावरून नवाब मलिक देत असलेले प्रत्युत्तर पाहता महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांत आपणही तोडीस-तोड उत्तर देऊ शकतो असे बळ निर्माण होऊ लागले आहे. नवाब मलिक हे म्हणूनच महाविकास आघाडीचे 'हिरो' ठरले आहेत.
- भाजपा विरोधात नवी उमेद -
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकला जात होता. अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांवर, नातेवाईक, मित्रांची ईडी, एनसीबी, सीबीआय, आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावला आहे. किरीट सोमय्या यांनीही अनेक प्रकरणावरून ईडी चौकशीची मागणी करत राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. राज्यातील नेते, मंत्री धास्तावले होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कारवाई टाळण्यासाठी भाजपा सोबत युती करावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यावरून भाजपाच्या आरोपांचा दबाव वाढल्याचे स्पष्ट दिसत होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत वगळता महा विकास आघाडीतील कोणी नेता भाजपा विरोधात उघडपणे बोलण्यास तयार नव्हता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आक्रमकपणे वानखडे प्रकरणाला दिलेले प्रतिउत्तर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्याना भाजपा विरोधात लढण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे.
- भाजपाचा आक्रमक सूर मावळला -
कार्डलिया क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने टाकलेल्या छाप्यात सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसहित सात जणांना ताब्यात घेतले. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणी सुमारे वीस जणांना ताब्यात घेतले आहे. भाजपाने या प्रकरणावरून महाविकास आघाडीवर घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबी अधिकाऱ्यांच्या कारवाईवर सांशकता निर्माण करत व्हिडिओ फोटोद्वारे कारवाईचे बिंग फोडले. यानंतर भाजपाने याला जातीय आणि धार्मिक रंग दिल्याचा आरोप करत नवाब मलिक यांच्यावर टीका केली. मात्र नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने भाजपाचा आक्रमक सूर मावळला आहे.
- भाजपा बॅफूटवर -