ETV Bharat / state

काँग्रेस गर्भगळीत, मोदींविरुद्ध उभे राहण्याची हिंमत नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar Alleges Congress

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 5:07 PM IST

Updated : Apr 29, 2024, 6:06 PM IST

Prakash Ambedkar Alleges Congress
प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Alleges Congress : मोदी सरकारच्या विरोधात उभे राहण्यास कॉंग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे. कॉंग्रेस गर्भगळीत झाली आहे, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे. मोदींनी मतदारांची अपेक्षा पूर्ण केलेली नाही, असंही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीवर बोलताना

मुंबई Prakash Ambedkar Alleges Congress : देशामध्ये संविधानवादी मतदार आणि मोदींनी अपेक्षाभंग केलेले मतदार अशी सध्या विभागणी आहे; मात्र देशहिताचे मुद्दे घेण्यात आणि मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे उभे राहण्यात काँग्रेस अपयशी ठरत आहे. काँग्रेस गर्भगळीत झाली असून काँग्रेसचे केंद्रीय आणि राज्यातील नेतेही हिंमत दाखवत नाहीत, असा घणाघात 'वंचित'चे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.

मोदींकडून अपेक्षाभंग : देशात सध्या संविधानवादी मतदार आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा असलेला मतदार अशा पद्धतीची विभागणी झालेली आहे. मात्र मोदींनी गेल्या दहा वर्षांमध्ये मतदारांची अपेक्षा पूर्ण केलेली नाही हे तितकच खरे आहे. त्यामुळे आता देशातील वातावरण बदललं आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.


व्यापारी वर्ग भाजपापासून दूर होण्याची शक्यता : देशातील बिझनेस मॅन आणि व्यापारी वर्ग हा असंघटित वर्ग असून तो मार्केट सेटल आहे की नाही यावर विसंबून असलेला वर्ग आहे. हा वर्ग सध्या भाजपाकडे होता. मात्र, आता तो भाजपापासून दूर चालला आहे. जर गडकरी मोठ्या फरकाने जिंकले तर हा मतदार भाजपासोबत आहे, असे मानता येईल. जर गडकरी मोठ्या फरकाने जिंकले नाहीत किंवा हरले तर हा मतदार भाजपापासून दूर गेला आहे असं म्हटलं पाहिजे, असं ते म्हणाले.

आमच्या मागे ईडी किंवा इतर यंत्रणा नाही - आंबेडकर : वंचित आघाडीवर भाजपाची 'बी' टीम म्हणून आरोप होत असल्याबद्दल विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गेल्या वेळेस आठ जागांवर मुस्लिम मते मिळाली पण हिंदूंची मते मिळत नाहीत. रामटेक मधून किंवा अन्य मतदारसंघातून त्यांचे अध्यक्ष लढायला तयार नाहीत. मुळातच काँग्रेसला भीती वाटत आहे. त्यांना भीती वाटत असेल तर आमची काही हरकत नाही आम्ही लढायला तयार आहोत त्यांनी त्या जागा सोडाव्यात आम्ही लढू. आमच्या मागे कोणतीही ईडी अथवा यंत्रणा लागलेली नाही. काँग्रेसच्या सर्वांच्या मागे ती लागली आहे. त्यामुळे त्यांनी गप्प बसावे. आम्ही त्यांना वाचवू असं प्रत्युत्तर आंबेडकर यांनी दिलं.

काँग्रेसला मदत नको : मुंबई आणि परिसरातील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आपण आपले उमेदवार जाहीर करत आहोत. काही मतदारसंघांमध्ये वंचितने काँग्रेसला मदत करण्यासाठी हात पुढे केला होता; मात्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्हाला मदतीची गरज नाही. त्यामुळे आता सर्वच जागा वंचित आघाडी लढणार असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.


वंचितला किती मते मिळणार हे स्पष्ट होईल : वंचित बहुजन आघाडीला राज्यात यंदा फारसे जनमत नाही असं विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत आपण आताच चर्चा करण्यापेक्षा चार जूनला या संदर्भात चर्चा करू शकतो. आम्हाला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात आम्हाला प्रतिसाद आहे. त्या पाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रातूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे आमच्या मतांची टक्केवारी वाढणार की कमी होणार हे 4 जूनला निश्चित स्पष्ट होईल, तेव्हा आपण याबाबत बसून ठरवू असेही ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये ती हिंमत नाही : देशात इंडिया आघाडीला किती जागा मिळू शकतात या संदर्भात विचारले असता ॲड. आंबेडकर म्हणाले की, शंकराचार्यांना कुणी डिफाय केलय का? शंकराचार्यांसोबत भेट झाली. त्यांच्याशी चार-पाच तास चर्चाही झाली; मात्र मोदींना काँग्रेसने चॅलेंज केलं नाही. काँग्रेस गर्भगळीत झालेली आहे. काँग्रेसला महत्त्वाचे मुद्दे घेताच येत नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर खरगे म्हणाले की, तुम्हाला टेप ऐकवू. वास्तविक जर इंदिरा गांधी हयात असत्या तर त्यांनी मोदींना लाल किल्ल्यावर बोलावलं असतं आणि म्हणाल्या असत्या इथे बसून आपण वादविवाद करू; परंतु काँग्रेसच्या आताच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांमध्ये हिंमतच उरलेली नाही. त्यामुळेच मोदी आणि भाजपाचे फावते आहे, असा टोलाही आंबेडकर यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदी सलग दोन दिवस राज्यात करणार झंझावती प्रचार , जाणून घ्या राज्यातील राजकीय परिस्थिती - PM MODI MAHARASHTRA visit
  2. बाप्पा यांना पाव रे! अरविंद सावंत, अनिल देसाईंसह राहुल शेवाळे अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी - Lok Sabha Election
  3. पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024
Last Updated :Apr 29, 2024, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.