मुंबई International Womens Day 2024 : मुंबईत आजही अनेक लोकं आहेत ज्यांना पोटभर अन्न मिळत नाही. महागाईच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता दोन वेळचं जेवण मिळवणं तसंही कठीणचं. अशा व यासारख्या अनेक नागरिकांना कमी पैशात चांगलं जेवण मिळावं हा मानस ठेवून शोभा साहेबराव पानमंद ह्या 1991 पासून नरिमन पॉइंट येथे रस्त्याच्या कडेला स्वादिष्ट जेवण बनवून अत्यंत कमी पैशात अनेकांचं पोट भरतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशा या कर्तृत्ववान स्त्रीशी ईटीव्ही भारतनं खास बातचीत केली आहे.
रोज तारेवरची कसरत : वडाळ्यात राहणाऱ्या शोभा मावशी यांचा दिनक्रम पहाटे 4 वाजल्यापासून सुरु होतो. सकाळच्या नाश्तासाठी पोहे, शिरा, उपमा आणि खिचडी इतके पदार्थ अगदी माफक दरात शोभा मावशींकडं आपल्याला खायला मिळतील. नरिमन पॉइंट परिसरात अनेक कार्यालयं असून या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी आपली सकाळची भूक ही शोभा मावशीच्या नाष्टानेच मिटवतात. त्यानंतर दुपारी शोभा मावशींच्या हातचं चमचमीत जेवण खाण्यासाठी मोठी गर्दी होते. केवळ 60 रुपयांमध्ये ग्राहकाला पोटभर असं घराची चव असणारं जेवण मिळतं. मात्र, रोज तारेवरची कसरत करणाऱ्या शोभा मावशी यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
आम्हाला कर्ज नको, परवाना द्या : ईटीव्ही भारतशी संवाद साधत असताना शोभा मावशी म्हणाल्या की, "मी 1991 पासून अनेकांना कमी पैशात पोटभर जेवू घालण्याचं काम करते. महिला धोरण जाहीर झालं असलं तरी आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही. महापालिकेकडून होणारी कारवाई अद्यापही टळलेली नाही. परवाना मिळावा म्हणून महापालिकेकडं अनेकदा संपर्क साधला. मात्र, अद्याप काही परवाना मिळालेला नाही. महापालिका कायम आम्हाला व्यवसायासाठी कर्ज घ्या म्हणून प्रोत्साहित करते. मात्र, आम्हाला कर्ज नाही तर व्यवसायासाठी परवाना हवाय", असं त्या म्हणाल्या. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या राज्याच्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अखेर मुहूर्त मिळालेलाय. मात्र, शोभा मावशीसारख्या महिला व्यवसायिकांना पाठबळ देण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळेल का? असा प्रश्न पडतोय.
हेही वाचा -