ETV Bharat / state

एक खासदार पडला तर फरक पडत नाही, रायगडचे भाजपा कार्यकर्ते आक्रमक - LOK SABHA ELECTION 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 8:06 PM IST

LOK SABHA ELECTION 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात धैर्यशील पाटील या भाजपाच्या नेत्याला उमेदवारी न देता विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, तटकरे यांचा प्रचार करणार नाही. एक उमेदवार पडला तर 400 आकड्याला फरक पडणार नाही. (BJP workers in Raigad) अशी ठाम भूमिका रायगड मधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे, असं पेण तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

तटकरे आणि भाजप कार्यकर्त्यांची बैठक
तटकरे आणि भाजप कार्यकर्त्यांची बैठक

मुंबई : LOK SABHA ELECTION 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीर केली आहे. त्यानंतर रायगड मधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. पेण येथील नेते धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असलेले भाजपा कार्यकर्ते नाराज होते. दरम्यान या मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाच्या नेत्यांनी सुनील तटकरे यांना मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न संपुष्टात आला, असं (Sunil Tatkare) सुनील तटकरे यांनी जाहीरपणे सांगितलं. मात्र, नेत्यांची दिलजमाई झाली असली तरी प्रत्यक्षात कार्यकर्ते मात्र अजूनही नाराज असल्याचं चित्र आहे.

रायगडचा खासदार पडला तरी चालेल : या संदर्भात रायगड पेण येथील भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात बोलताना, म्हात्रे म्हणाले केंद्रात पुन्हा एकदा मोदी यांचं सरकार येणार यात वाद नाही. मात्र, 400 पेक्षा अधिक जागा मिळवत असताना रायगडमधील एक जागा पडली तर त्याचा फरक पडणार नाही. (Lok Sabha constituency) सुनील तटकरे यांना पुन्हा दिल्लीला पाठवलं नाही तर रायगडचा फायदाच होईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तटकरे यांनी प्रत्येक वेळेला शब्द फिरवण्याचं काम केलं आहे. जर, ते आता पडले तर रायगडमधील तरुण राजकीय युवकांना निश्चितच नवसंजीवनी मिळेल. आजपर्यंत रायगडच्या तरुण राजकीय नेत्यांना संपवण्याचाचं काम तटकरे यांनी केलं. ज्यांनी-ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना-त्यांना त्यांनी संपवलं आहे. दर निवडणुकीला नवीन साथीदार घेऊन ते मैदानात उतरतात. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद किती आहे, याचेही एकदा मूल्यमापन व्हायला पाहिजे. महायुती म्हणून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली असेल. परंतु, आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहोत आम्हाला हे कदापिही मान्य नाही असंही ते म्हणाले आहेत.

गुरूंना संपवणाऱ्यावर कसा विश्वास : आपल्या दोन्ही राजकीय गुरूंना म्हणजे बॅरिस्टर ए. आर. अंतुले आणि शरद पवार यांच्यावर तटकरे यांनी कुरघोडी केली. घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटलांचा विश्वासघात केला. त्या माणसावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. स्वतःचं काम झाल्यावर लोकांना विसरायचं हा आजवरचा त्यांचा अनुभव आहे. जुन्या शेकापच्या कार्यकर्त्यांना वगळून त्यांनी फक्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमून त्यांना खासदार निधी दिला. त्यांनी धैर्यशील पाटील यांना मदत करतो म्हणून आश्वासन दिलं. मात्र, विधानसभेला त्यांना जे करायचं होतं तेच त्यांनी केलं. गेल्या निवडणुकीत त्यांनी शेकापची मदत घेतली. आता या निवडणुकीत ते भाजपाची मदत घेणार आणि दरवेळेला दुसऱ्याच्या मदतीने निवडून जाणार हे आम्हाला चालणार नाही. त्यामुळे अशा विश्वासघातकी माणसावर विश्वास ठेवून आम्ही मतदान करणार नाही, असा ठाम इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.

हेही वाचा :

1 एकनाथ खडसे यांची लवकरच 'घरवापसी', भाजपात परतण्याचे दिले संकेत - Lok Sabha Election 2024

2 श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची खेळी, 'या' महिला उमेदवाराला कल्याण-डोंबिवली मतदारसंघात उमेदवारी - Lok Sabha Election 2024

3 प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा फायदा नक्की कुणाला? - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.