ETV Bharat / politics

महायुतीची जागा वाटपाची दिल्लीतील बैठक रद्द; एकनाथ शिंदे, अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 3:54 PM IST

Mahayuti Meeting Delhi Cancel : दिल्लीत जागावाटपासंदर्भात होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आलीय. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Devendra Fadnavis) गटाचं टेन्शन वाढलंय. तर याबाबतचा अंतिम निर्णय कधी होईल याकडं दोन्ही गटाच्या नेत्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले आहेत.

Mahayuti Meeting Cancel
जागा वाटपाची दिल्लीतील बैठक रद्द

मुंबई Mahayuti Meeting Delhi Cancel: महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नसताना या संदर्भात आज दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर होती. परंतु दिल्लीत होणारी ही बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आलीय. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तशा पद्धतीच्या सूचना राज्यातील महायुतीच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत. या कारणास्तव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं टेन्शन अधिक वाढलं आहे.



जागा वाटपाचा तिढा सुटेल का? : मागील अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. दोन-चार जागांवर मतभेद आहेत, पण तेही लवकरच सोडवले जातील असं वारंवार महायुतीच्या तिन्ही पक्ष्यांचे प्रमुख नेते सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, ते स्वतः, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट करून जागा वाटपाचा तिढा आज सोडवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी सांगितलं होतं. परंतु महायुतीच्या या नेत्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत असलेली आजची बैठक रद्द करण्यात आली असल्यानं, यामागे नक्की काय कारण असू शकतं? यावर चर्चा सुरू झाली आहे.

जागा वाटपाचा तिढा सुटेल का? : विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते जरी या बैठकीला गेले नसले तरीसुद्धा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची जागा वाटपा संदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याऐवजी अगोदर भाजपाच्या राज्यातील नेत्यांशी पुन्हा विचार विनिमय केला जाणार असल्यानं नक्की हा जागा वाटपाचा तिढा सुटेल का? की हा तिढा अद्याप कायम राहील? हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय.



आमच्यामध्ये फार काही ताणतणाव नाही : या आजच्या बैठकीबद्दल बोलताना दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, महायुतीमध्ये आतापर्यंत ८० टक्के जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. तर फक्त २० टक्के जागांवर चर्चा होणार असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये तो निर्णय अंतिम होईल. आमच्यामध्ये फार काही ताणतणाव नाही. अनेक जागांबाबत आमचं एकमत झालं असून विरोधक विनाकारण याबाबत राजकारण करत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.



शिंदे - पवार गटासाठी १८ ते १३ जागा : महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे. विशेष करून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. त्या जागांची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जात असताना, त्यांची मागणी भाजपाकडून डावलली जात आहे. तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेससाठी १० ते १२ जागांची मागणी केली जात आहे. त्याकडंही भाजपाचे नेतृत्व दुर्लक्ष करत आहे. आठ दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र, मुंबई दौऱ्यावर आले असताना जागा वाटपाचा तिढा सुटून अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा असताना त्यावर तोडगा निघाला नाही. अशा परिस्थितीत आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गटानं भाजपाकडं केलेली जागांची मागणी कितपत सफल होते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे.

काय तोडगा निघू शकतो? : या निवडणुकीत भाजपा राज्यामध्ये ३० ते ३५ जागांवर कमळ या चिन्हावर निवडणूक लढण्यास आग्रही आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटांना मिळून १८ ते १३ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. जे अशक्य असेच आहे. अशा परिस्थितीमध्ये आता यामधून काय तोडगा निघू शकतो ते बघावं लागणार आहे.



आजची बैठक ही महत्त्वाची : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जागा वाटपा संदर्भात असलेली दिल्लीतील बैठक जरी आज रद्द झाली, तरी सुद्धा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची होणारी बैठक फार महत्त्वाची असणार आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीचा लेखाजोखा यापूर्वीच भाजपाच्या राज्यातील नेतृत्वानं केंद्राकडं सोपवला असला तरी सुद्धा सध्याची परिस्थिती काय आहे आणि यातून काय मार्ग निघू शकतो, याबाबत आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची अंतिम चर्चा करणार आहेत. तसेच महाराष्ट्रात परतल्यानंतर तो निर्णय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितला जाण्याची शक्यता आहे. त्या निर्णयावर सहमती झाली तर एक अंतिम बैठक भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर होऊन एक ते दोन दिवसात याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -

  1. "...असले साप उशाला घेऊन झोप येणार नाही", नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव? वाचा सविस्तर
  2. जागावाटपाचा अजित पवारांना बसणार पहिला धक्का...आमदार निलेश लंके शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश?
  3. भाजपा खासदार अनंतकुमार हेगडेंच्या 'त्या' विधानावरून कर्नाटकात रणकंदन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.