ETV Bharat / politics

"तुम्हारे पास पीएम, सीएम, मिनिस्टर्स है, तो मेरे पास..."; राजू शेट्टींनी व्यक्त केला लोकसभा विजयाचा विश्वास - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 8:36 PM IST

Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हातकणंगलेमधून लाखांच्या मतफरकानं विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केलाय.

राजू शेट्टी
राजू शेट्टी (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर Lok Sabha Election : राज्यातील 48 लोकसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली असून अवघ्या देशाचं लक्ष आता 4 जूनच्या दिवसाकडं लागलंय. केंद्रातील सत्ताधारी भाजपानं 400 लोकसभा जागा जिंकणारच असा चंग बांधलाय. तर विरोधी 'इंडिया' आघाडी आम्हीच देशाचं सरकार बनवणार असा दावा करत आहे, राज्यातील अनेक जागांपैकी जी लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरली त्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिली, यात त्यांनी हातकणंगलेमधून लाखांच्या मतफरकानं विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

राजू शेट्टी (ETV Bharat Reporter)

तुम्हारे पास पीएम, सीएम, मिनिस्टर्स है, तो मेरे पास जनता है : हातकणंगले लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडलं असून महायुती, महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात प्रामुख्यानं शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात महायुतीकडून धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर असा अटीतटीचा सामना झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळावा यासाठी दोन वेळा राजू शेट्टींनी प्रयत्न केले. मात्र, अखेरच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला. या जागेवर शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील (सरुडकर) यांनी आपल्या लोकसंपर्काच्या बळावर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराचा धडाका लावला होता. एकीकडं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी तगड्या नेत्यांची फौज मैदानात उतरली होती तर महाविकास आघाडी उमेदवाराच्या मागंही शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात जयंत पाटील यांच्यासारखे नेते प्रचाराची धुरा सांभाळत होते. दोन्ही युती आघाड्यांशी समझोता न झाल्यानं 'एकला चलो रे'ची भूमिका घेतलेल्या राजू शेट्टी यांनी मात्र सामान्य शेतकरी कार्यकर्ते यांच्या संघटनेतून यंदा कोणत्याही परिस्थितीत विजयी गुलाल खेचण्यासाठी प्रयत्न केले. महायुतीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री होते याचं आव्हान वाटलं नाही का, असा सवाल केल्यानंतर राजू शेट्टी यांनी "तुम्हारे पास पीएम, सीएम, मिनिस्टर्स है, तो मेरे पास जनता है" असा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील डायलॉग म्हणत निकाला आधीच मतदार संघात रंगत वाढवली.

लोकवर्गणीतून खासदार होणारा पहिला लोकप्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या निवडणुकीचं वेगळं वैशिष्ट्य कायम राहिलंय. 2004 मध्ये विधानसभेचे सदस्य राहिलेल्या राजू शेट्टी यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा लोकसभेत बाजी मारली होती. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेनं लोकवर्गणी करुन राजू शेट्टींच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहिली असंही राजू शेट्टींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. तसंच असा खासदार होणारा मी देशातला पहिला लोकप्रतिनिधी असेल असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांचा मी रखवालदार असल्याचंही सांगितलं.

हेही वाचा :

  1. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभेचा अचूक अंदाज सांगा आणि बक्षीस मिळवा; पुण्यातील अनोख्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा - lok sabha election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.