ETV Bharat / politics

"मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाकरिता हेलिकॉप्टरमधून १२ ते १३ कोटी रुपये नेले, लवकरच..."- संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut news today

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 12:24 PM IST

Updated : May 13, 2024, 1:25 PM IST

money distribution allegation निवडणुकीच्या काळात पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरण्यात आलेल्या बॅगमध्ये पैसे होते, असा त्यांनी आरोप करत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. निवडणुकीत पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधानांसह राज्याच्या गृहमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केले.

Sanjay Raut slams Mahayuti
संजय राऊतांचे पैसे वाटपाचे मुख्यमंत्र्यांवर आरोप (Courtesy - ETV Bharat Graphics/Sanjay Raut X Media)

मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा नेत असल्याचा आरोप (Source- ETV Bharat Reporter)

मुंबई money distribution allegation - देशभरात आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. तर, नेतेमंडळी 20 मे रोजी पार पडणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या तयारीला लागले आहेत. पाचव्या टप्प्यात मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांसह धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, या लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील मतदान पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा नेत असल्याचा आरोप केला आहे. खासदार राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील निवडणुका असलेल्या छत्रपती संभाजीनगर, पुणे असेल अशा इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप, पैशाची देवाणघेवाण, पैशाची आवक-जावक ही स्पष्ट दिसत आहे. पुण्याती लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस स्टेशन समोर धरणं केलं आहे.

पोलिसांच्या मदतीने पैशाचं वाटप सुरू आहे. नरेंद्र मोदी, जरा बघा नुसतं ज्ञान देऊ नका. गृहमंत्री फडणवीस आपण जरा पाहा. नगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना भाजपाच्या पदाधिकाऱ्याला लोकांनी पकडलं आहे-खासदार संजय राऊत


निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर झापडं आली आहेत का?-पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन तासासाठी नाशिकमध्ये आले. जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत. 500 सूट आणले का? की 500 सफारी आणले? त्या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये नेल्या? तिथून कोणाला वाटल गेलं? हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकर देत आहोत. आमच्या गाड्या तपासल्या जात आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं जात आहे. मी सांगलीत गेलो, तेव्हा माझ्या हेलिकॉप्टरचीदेखील तपासणी झाली. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री त्यांचे मंत्री हे खोके आणि बॉक्स उतरवित आहेत. त्यांचा तपास कोणी करायचा? निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर झापडं आली आहेत का? राज्याचे पोलीस महासंचालक आमचे फोन रेकॉर्ड करण्यात कर्तव्यदक्ष होते. त्या काय गॉगल लावून बसल्या आहेत का?" अशा शब्दात ठाकरे गटाच्या मुख्य प्रवक्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.


12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये आले- "ईडी ही नरेंद्र मोदी यांची लुटारू टोळी आहे. महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पडतोय. उन्हाळ्यामध्ये तो पाऊस कितीही पडू द्या. नरेंद्र मोदींचा पराभव हा ठरला आहे. विकासाचा मुद्दा असता तर हेलिकॉप्टर विमानातून मोदी आणि शिंदे यांच्या बॅगा पैसे वाटपासाठी उतरल्या नसत्या. मोदी आतापर्यंत देशावर आणि विकासावर बोलले आहेत का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील बोलले आहेत का? बारामतीमध्ये पैसे वाटपाकरिता रात्री आणि पहाटे बँका उघडल्या होत्या. त्या अजित पवार यांच्या ताब्यामधली बँका होत्या. निवडणूक आयोगानं काय केलं? नाशिकमधील व्हिडिओ हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्या हेलिकॉप्टरमधून नऊ मोठ्या बॅगा उतरल्या. त्यामधून किमान 12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये आले. त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं." असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

सरकारी यंत्रणेचा वापर करून पैसे वाटप- "आता या पैशाचं हॉटेलमधून कुठे-कुठे वाटप झालं ते मी तुम्हाला सांगतो. पोलीस पैसे वाटपाचं काम करत आहेत. बारामतीतदेखील तेचं केलं. गॅंग निर्माण केली आहे. मोदी, शिंदे, अजित पवार आणि फडणवीस हे सरकारी यंत्रणेचा वापर करून पैसे वाटत आहेत. कुठून आला पैसा? नरेंद्र मोदी यांची ईडी कुठे आहे? कोल्हापुरातदेखील छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे हे किमान 15 ते 20 सुटकेस घेऊन हॉटेल शालीमारला थांबले होते. तरी शाहू महाराज विजय होत आहेत. ज्या शाहू महाराजांना आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला, ते महाराष्ट्राचे भूषण आहेत. "


राज ठाकरे सुपारीबाज असल्याचा भाजपानं केला होता आरोप- रविवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राज ठाकरे सुपारीबाज आहेत. ही पहिली गर्जना आम्ही नाही, भारतीय जनता पक्षानं केली होती. राज ठाकरे सुपारी घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात, हे आम्ही कधीच म्हणालो नाही. खासकरून देवेंद्र फडणवीस यांना जर विस्मरणाचा झटका आला असेल आणि ते आता नरेंद्र मोदी यांच्या सभेत सुपारी कनवटीला लावून बसणार असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो. सुपारी घेऊन पाठिंबा आणि प्रचार करतो हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे.

हेही वाचा-

  1. "संजय राऊतांची सुरक्षा फक्त १५ मिनिटं हटवाच अन्...."; नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane on Sanjay Raut
  2. "राज ठाकरेंच्या भूमिकेमुळं बाळासाहेबांच्या आत्म्याला...'; संजय राऊतांची टीका - Sanjay Raut
  3. 'मी कोणाला औरंगजेब म्हटलं नाही, ही एक विकृती आहे' - संजय राऊत यांचे स्पष्टीकरण - Sanjay Raut criticizes Modi
Last Updated : May 13, 2024, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.