वाशिम- जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील आडोळ प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. शेतीसाठी पाण्याची सोय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आडोळ प्रकल्पातून रिसोड शहरासह, शिरपूर, रिठद गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो.
आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे रिसोड शहरासह, शिरपूर, रिठद गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. परिसरातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीच्या काळात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत होते. मात्र, गत पंधरा दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी टंचाईची चिंता दूर झाल्याचे दिसून येत आहे.