ETV Bharat / state

२२ जानेवारीला दक्षिण- मध्य मुंबईत लखलखणार एक लाख दिवे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 9:59 PM IST

Ram Temple Inauguration: २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार असून यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. यानिमित्ताने भाजपाकडून संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण-मध्य मुंबई सुद्धा एक लाख दिवे घरोघरी लखलखणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात या दिवशी दिवाळी साजरी करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यापूर्वीच दिले आहेत.

Ram Mandir News
मुंबईत लखलखणार एक लाख दिवे

प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष,राजेश शिरवाडकर

मुंबई Ram Temple Inauguration : २२ जानेवारी हा देशासाठी ऐतिहासिक दिवस असून या दिवशी अयोध्येत श्रीराम लल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुंबईत भाजपाकडून घरोघरी दिवे पेटविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील जनतेला या दिवशी दिवाळी साजरी करण्याची विनंती केली आहे. संपूर्ण मुंबई परिसर, मुंबईतील मंदिरे दिव्याने उचलून निघणार आहेत.

मुंबईत पेटवणार लाख दिवे : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. तर भाजपा आमदार राम कदम यांनी २२ जानेवारीला राज्यात मांसाहार आणि दारूबंदी करावी अशी मागणी केली आहे. हा दिवस राज्यात उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून दक्षिण-मध्य मुंबईत सुद्धा एक लाख दिवे पेटविण्यात येणार आहेत.

प्रभू रामचंद्राची आरती करून दिवे पेटवायचे : याबाबत बोलताना भाजपाचे मुंबई दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष, राजेश शिरवाडकर म्हणाले की, २२ जानेवारी हा दिवस संपूर्ण सनातन धर्म तसेच देशवासींसाठी फार मोठा आनंदाचा दिवस आहे. ४९३ वर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्राची त्याच अयोध्ये नगरीमध्ये प्राण प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. या वातावरणामध्ये मुंबई मध्य-दक्षिण जिल्ह्याच्या वतीनं एक संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाद्वारे एक लाख कुटुंबापर्यंत दिवे देण्यात येणार आहेत. २२ जानेवारी रोजी संपूर्ण देश दिवाळी साजरी करणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा आपण सर्वांनी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी येणार आहोत. यात अयोध्या येथून आणलेल्या अक्षता, अयोध्येची माहिती पुस्तिका आणि दिवे समस्त रामभक्तांना मुंबईभर देण्यात येणार आहेत. येत्या २२ तारखेला प्रभू रामचंद्राची आरती करून आपल्या दारी प्रत्येकाने हे दिवे पेटवायचे आहेत, असं आवाहनही राजेश शिरवाडकर यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. जितेंद्र आव्हाड वादग्रस्त वक्तव्यामुळं सतत वादाच्या भोवऱ्यात, आव्हाड आणि वाद काय आहे समीकरण?
  2. प्रभू रामचंद्राचा हक्क भाजपावाले घेऊ शकणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे
  3. अयोध्या निमंत्रणाच्या प्रश्नावर उदयनराजेंनी आपल्या स्टाईलने दिलं 'हे' उत्तर, पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.