ETV Bharat / state

सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा, काहीही झालं तरी धारावीकरांना घरं देणार; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 7:47 AM IST

Dharavi Redevelopment Project
संपादित छायाचित्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

Dharavi Redevelopment Project : धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं काम अदानी समूहाला मिळालंय. परंतु याविरोधात आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

पुणे Dharavi Redevelopment Project : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग समूहाला मिळालेलं आहे. परंतु, या कंत्राट भरतीत अदानींचा फायदा जास्त असल्याचं म्हणत शिवसेनाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज याविरोधात मोर्चा काढत आहे. हा मोर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट केवळ सुपारी घेऊन काढत असून काहीही झालं तरी, आम्ही धारावीकरांना घरं देणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्यात दिलीय.


टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या निविदेतील सर्व नियम आणि अटी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतल्याप्रमाणंच ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांना नेहमीच दुटप्पी भूमिका घ्यायची असते. मुंबईत टीडीआरमध्ये एक मोठी लॉबी कार्यरत असून या लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात येत आहे. काहीतरी करुन धारावी झोपडपट्टीचा विकास रेंगाळत ठेवण्याचा यांचा प्रयत्न आहे. परंतु, आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू. काहीही झालं तरी धारावीकरांना पक्की घरं देण्याचा सरकारचा मानस असून आम्ही ते देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले. पुण्यात विमानतळावर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


मोर्चानं काहीही फरक पडणार नाही : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी झोपडपट्टी ओळखली जाते. या धारावी झोपडपट्टीचा विकास कोणी करावा, यावरुन आताही मतभेद निर्माण झाले आहेत. या मोर्चानं काहीही परिणाम होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध उद्योगपती अदानी असा संघर्ष सुद्धा आज मुंबईत पाहायला मिळू शकतो.


600 एकरवर वसलेली आहे झोपडपट्टी : आशियातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी जवळपास 600 एकरवर वसलेली आहे. धारावीत 60 हजारांहून अधिक झोपड्या असून त्यात 10 लाखांहून अधिक लोक राहतात. शिवाय धारावीत 13 हजारांहून अधिक लघु उद्योगही आहेत. या लघु उद्योगांतून धारावीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळं धारावीसाठी निघणाऱ्या या मोर्चावरुन आता राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय.

हेही वाचा :

  1. धारावीचा अदानींकडून पुनर्विकास करण्याला विरोध, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
  2. अदानींसाठी धारावी प्रकल्पात टीडीआरच्या दरात वाढ - काँग्रेसचा आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.