ETV Bharat / state

BJP Mahajansampark Campaign: 'महाजनसंपर्क अभियाना'तून ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची भाजपची योजना - विनोद तावडे

author img

By

Published : May 30, 2023, 6:01 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे देशभर 'महाजनसंपर्क अभियान' राबविण्यात येणार आहे. याद्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आज (मंगळवारी) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३० मे ते ३० जून या काळात हा कार्यक्रम राबविला जाईल.

BJP Mahajansampark Campaign
विनोद तावडे पीसी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मुंबईतील पत्रपरिषदेत बोलताना

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या सर्व मतदारसंघात प्रवास करणार आहेत. ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेने अभियानाला प्रारंभ होणार असल्याचेही विनोद तावडे यांनी सांगितले.

'ही' आहे कार्यक्रमाची रुपरेषा: याप्रसंगी विनोद तावडे यांनी सांगितले की, ३० मे ते ३० जून या काळात होणाऱ्या या 'महाजनसंपर्क अभियाना'त मोदी सरकारच्या विविध योजनातील लाभार्थींचे संमेलन, प्रबुद्ध संमेलन, जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे अनेक कार्यक्रम राबविले जाईल. प्रत्येक लोकसभा मतदार संघात समाजातील मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती, पद्म पुरस्कार, खेल पुरस्कार व अन्य महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती अशा सुमारे साडेपाच लाख मान्यवरांना ‘संपर्क ते समर्थन’ या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्तिगत भेटी दिल्या जाईल. त्यांच्यापर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. विचारवंतांबरोबर त्या लोकसभा मतदारसंघात प्रवास करणारे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री हे गेल्या ९ वर्षांतील देशाच्या प्रगतीबाबत विचारमंथन करतील. तसेच जनसंघापासून भाजपमध्ये काम करणारे वरिष्ठ कार्यकर्ते, भाजप विचाराला समर्थन देणारे अन्य संस्थांचे कार्यकर्ते यांच्याशीही केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते संवाद साधतील.

महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत अजमेर येथे 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. येथून अभियानाला सुरुवात होऊन ते 30 जून पर्यंत चालेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशातील 80 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे नियोजन आहे. दरम्यान पीएम मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल. - विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप


अभियानांतर्गत 12 सभांचे आयोजन: अभियानाच्या शेवटच्या १० दिवसात प्रत्येक मतदारसंघात मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची पुस्तिका घरोघरी पोहोचवली जाणार आहे. या 'महाजनसंपर्क अभियाना'दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुमारे १२ सभांचे आयोजन करण्यात येईल. याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व अन्य नेत्यांच्या सभांचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे भाजपच्या युवा, महिला, अनुसूचित जाती-जनजाती आणि शेतकरी अशा वेगवेगळ्या आघाड्यांमार्फत सभांचे आयोजन केले जाईल. त्यासह प्रत्येक घटकाला ९ वर्षांच्या काळात काय मिळाले याची माहिती देण्यात येईल, असेही तावडे यांनी नमूद केले.

१० लाख बूथवर 'ऑनलाईन सभा': २३ जून रोजी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 'बलिदान दिनी' पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या १० लाख बूथवर ऑनलाईन सभेद्वारे संबोधित करतील. दोनतृतीयांश पेक्षा अधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे नियोजन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. देशातील जनतेने याला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.

हेही वाचा:

  1. Devendra Fadnavis Met Raj Thackeray : राज ठाकरेंसोबत भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
  2. Ajit Pawar on Seat Allocation: कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्याने...अजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य
  3. Ashok Gehlot And Sachin Pilot : अशोक गेहलोत, सचिन पायलटचे 'हम साथ साथ है' चित्र चौथ्यांदा समोर, मात्र भविष्यावर सस्पेंस कायम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.