मुंबई - माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना हा वाद नवा नाही. कोश्यारी अनेकवेळे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा कोश्यारी यांनी शिवसेनेला डिवचले आहे. उद्धव ठाकरेंना काँग्रेस, राष्ट्रवादीने बळीचा बकरा बनवले आहे. ते संत प्रवृत्तीचे आहेत. ते कशाला राजकारणात आले, त्यांना कुणी मु्ख्यमंत्री केले हे त्यांनाच माहिती. असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंचे कौतुकही केले आहे.
उद्धव ठाकरेंना टोमणे - उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत. ते संत प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे त्यांनी आता राजकारण, पद यापासून लांब राहावे, असे विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवले होते, आता त्यांना देवानेच सत्तेच्या गादीवरुन खाली उतरवले आहे, असेही कोश्यारी म्हणाले.
तुम्ही मला विमानातून खाली उतरवले होते- भगतसिंह कोश्यारी आणि विमान वाद हा देखील राज्यात चर्चेचा विषय बनला होता. भगतसिंह कोश्यारी आणि राज्य शासनामध्ये सरकारी विमान प्रवासावरून वादंग निर्माण झाले होते. त्यावेळेसच्या महाविकास आघाडी सरकारने भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान नाकारले होते. त्यामुळे विमानात बसलेल्या कोश्यारींना खाली उतरावे लागले होते. त्यानंतर कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. यावरून कोश्यारी यांनी आज उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही मला विमानातून खाली उतरवले होते, आता देवानेच तुम्हा सत्तेतून खाली उतरवले आहे, असे कोश्यारी म्हणाले.
आदित्य ठाकरेंचे कौतुक - भगतसिंह कोश्यारी यांनी आदित्य् ठाकरे यांचे कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे हे माझ्या मुलाप्रमाणे आहे. ते पुढे जाऊन चांगले काम करतील. आदित्य पुढे जाऊन प्रगती करतील. त्यांनी जर चांगले काम केले तर त्यांना पुढे चांगले भवितव्य असल्याचे कोश्यारी म्हणाले.
कोश्यारी पदमुक्त - भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदावरून आता मुक्त झाले आहेत. मोदींच्या मुंबई भेटीदरम्यान, त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवा राज्यपाल झाले आहेत.