ETV Bharat / state

पीक विम्याच्या १७०० कोटींचे वाटप पूर्ण, उर्वरित ५०० कोटींचे वाटप सुरू - धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 6:52 PM IST

crop insurance पीक विम्याच्या १७०० कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे. तसंच उर्वरित ५०० कोटींचे वाटप सुरू करण्यात आले आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

मुंबई - एक रुपयात पीक विमा योजनेची राज्य शासनाने अंमलबजावणी केली आहे. तसंच राज्यात अग्रीम २५ टक्के अंतर्गत आतापर्यंत २२०६ कोटी रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक पीक विमा रकमेचे वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरित सुमारे ५०० कोटी रुपयांच्या पीक विमा रकमेचं वाटप प्रगतीपथावर असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.

आमदार कुणाल पाटील यांची लक्षवेधी - धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला नसल्याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. याला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्ह्यातील आकडेवारी विधानसभेत सादर केली. धुळे जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या एचडीएफसी या विमा कंपनीने अग्रीम अधिसूचनेच्या विरोधात जिल्हा प्रशासन, तसंच राज्य शासनाकडे अपील केलं असता हे अपील राज्यसरकारने फेटाळून लावलं आहे. धुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना ६९ कोटी रुपये इतका विमा आजपर्यंत अग्रीम अंतर्गत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.


७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला - राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात २०२३ मध्ये महाराष्ट्रातील एक कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. तसंच आतापर्यंत अग्रीम अंतर्गत ७० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत मिळालेली २२०० कोटी रुपये रक्कम ऐतिहासिक आहे, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.

पीक विम्याचा लाभ मिळणार - चालू रब्बी हंगामात देखील मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता राज्यातून ७१ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा भरला आहे. सध्या चर्चेत असलेल्या हरभरासारख्या विविध पिकांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भरलेल्या पीक विम्याचा लाभ मिळणार असून यामध्ये कुठेही अडचण आल्यास शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी विभाग ठामपणे उभा असल्याची ग्वाही मुंडे यांनी यावेळी दिली.

हे वाचलंत का..

  1. अवकाळी पावसाचा 65 हजार शेतकऱ्यांना फटका, केवळ 18 हजार शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा
  2. Dhananjay Munde : विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु - कृषीमंत्री धनंजय मुंडे
  3. Crop Loan Beed बीडमध्ये १२ हजार शेतकऱ्यांना परत करावी लागणार पीक विम्याची रक्कम, कंपनीने केला तांत्रिक चुकीचा दावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.