ETV Bharat / state

Ajit Pawar Criticized CM : अजित पवारांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावरुन शिंदे सरकारला फटकारले

author img

By

Published : Apr 18, 2023, 7:24 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मागील आठ दिवसापासून त्यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चेवर सडेतोड उत्तर देत सर्वच प्रश्नांवर पूर्णविराम दिला आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अजित पवार यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर ताबडतोब खुद्द अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच अशा बातम्या पसरवणाऱ्यांना मीडियासहित इतर पक्षाच्या प्रवक्त्यांनासुद्धा फटकारले आहे.

Ajit Pawar Criticized CM
Ajit Pawar Criticized CM

मुंबई : आज अजित पवार यांनी विधान भवनातील त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांच्या आमदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, कालपासून माझ्याबाबत माझ्या सहकार्याबाबत जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या बातम्या सुरू आहेत. अशा कुठल्याही पद्धतीच्या चर्चा नाहीत. माझ्याबाबत ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही. माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या सह्या घेण्यात आल्या नाही. वेगवेगळ्या पक्षाचे नेते त्याबाबत भाष्य करतात, त्यात काहीही तथ्य नाही आहे. सर्व जण मला कामानिमित्त भेटत असतात तसे भेटत आहेत. ज्या बातम्या दाखवल्या जातात त्यामुळे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होतो.

राज्यात अनेक प्रश्न :राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पाऊस, बेरोजगारी, गारपीठ,७५ हजार कामगार भर्ती अजून होत नाही. कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत भेटत नाही आहे. हरभरा खरेदी केंद्र बंद आहेत. त्यावरही लक्ष द्यायला हेवे असेही अजित पवार म्हणाले.

खारघर येथे खर्च केलेले १४ कोटी गेले कुठे? : खारघरला जी काही दुर्घटना झाली त्यात निष्पाप लोकांचा बळी गेला. एवढ्या उन्हात कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. उशिरा सुद्धा कार्यक्रम घेता आला असता. आम्हाला त्या बाबत राजकारण करायचे नाही. १४ कोटी खर्च केले मग मंडप का घालण्यात आला नाही. राजभवनात हॉलमध्ये किंवा बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घ्यायचा होता. निषकाळजीपणा झाला आहे. हे सरकारचे अपयश आहे. ज्यांचा जीव गेला आहे त्यांच्या कुटुंबाला जास्त मदत द्यायची गरज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या विभागाचे सचिव या सर्वांना समजायला पाहिजे होते. कार्यक्रम कधी घ्यायला हवा होता. असे सांगत अजित पवार यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार निमित्ताने गेलेल्या निष्पाप जीवांवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

माझ्यावर इतकी करडी नजर का? : अजित पवार यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून असणाऱ्या मीडियालाही अजित पवारांनी आज धारेवर धरले. अजित पवार म्हणाले की, तुमचे काय चालले आहे? माझ्या देवगिरी निवासस्थानाबाहेर कॅमेरे लावले जातात. माझी आग्रहाची विनंती आहे. तुम्हीच संभ्रम निर्माण करत आहात. वज्रमूठ सभेत मी बोललो नाही. म्हणून त्यावर चर्चा रंगल्या. पण आमचे असे ठरले होते की, प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील. कार्यक्रम वेळेत आटोपता आला पाहिजे, म्हणून हे ठरवले होते. पण अजित पवार बोलले नाहीत त्यावर चर्चा होते. जे बोलतात त्यांना दाखवले जात नाही. माझ्या ट्विट मध्ये असे काही नाही, जे होते तेच आहे. झेंडा काढला, काय काढले, ध चा मा करू नका? काय झाले तर मी स्वतः सांगेन. आता काय एफिडेव्हिट त लिहून देऊ का? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

आमचे वकीलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नये? : तसेच,आमचे वकीलपत्र दुसऱ्यांनी घायचे कारण नाही. त्यांच्या मुखपत्रात त्यांनी त्यांना हवे ते लिहावे पण आमच्या बाबत नाही. आमच्या पक्षा बाबत आमचे प्रवक्ते बोलतील. शिंदे गटाचे प्रवक्ते पण काय काय बोलतात. ते पक्ष घेऊन आले तर आम्ही बाहेर पडू. अरे बाबा थांबा. असे काय करू नका? असे सांगत त्यांनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत, शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनाही फटकारले आहे.



हेही वाचा - Ajit Pawar on Rumour of Rift : माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीसोबत; अजित पवारांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.