ETV Bharat / sports

Ind Vs Pak Asia Cup : पाकिस्तानचे 'हे' तीन गोलंदाज ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी, जाणून घ्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 1:48 PM IST

Ind Vs Pak Asia Cup : भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आशिया चषक महत्त्वाचा आहे. आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे हवामानाचा विचार करता शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ हे पाकिस्तानी गोलंदाजी त्रिकुट पॉवरप्लेमध्ये धोकादायक ठरू शकतात.

Ind Vs Pak Asia Cup
Ind Vs Pak Asia Cup

पल्लेकल्ले : Ind Vs Pak Asia Cup : आशिया चषक स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. हा सामना विश्वचषकापूर्वीची रंगीत तालीम मानली जात आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मासारखे दिग्गज फलंदाज हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या धडाकेबाज वेगवान आक्रमणाचा सामना करतील.

दोन्ही संघांच्या स्टार्सना चमकण्याची संधी : गेल्या वर्षी टी २० विश्वचषकात मेलबर्नमध्ये रौफच्या चेंडूवर कोहलीने मारलेला शानदार शॉट भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अजूनही लक्षात असेल. त्याचवेळी शाहीनच्या वेगवान चेंडूंचा सामना करण्यात अपयशी ठरलेला रोहित कसा एलबीडब्ल्यू आऊट झाला होता, हेही पाकिस्तानी चाहते विसरणार नाहीत. अशा कामगिरीमुळेच खेळाडू दिग्गज बनतात. आता आशिया कपमध्ये देखील दोन्ही संघांच्या स्टार्सना आपापल्या देशात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल.

पावसाचा अंदाज : हवामान खात्याने शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवलाय. ढगाळ वातावरण पाहता पाकिस्तानी गोलंदाजी त्रिकुट पॉवरप्लेमध्ये धोकादायक ठरू शकते. दोन्ही संघांच्या मधल्या फळीबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला मधल्या फळीत उतरवलं जाऊ शकतं. परंतु चौथ्या आणि पाचव्या स्थानाबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही.

  • #WATCH | Kandy, Sri Lanka: Visuals from outside Pallekele International Cricket Stadium where India VS Pakistan match in the Asia Cup is scheduled to take place today. pic.twitter.com/Tkfowp9Nj1

    — ANI (@ANI) September 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तान संघ अननुभवी : किशननं कधीही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली नाही. तर मधल्या फळीत त्याची सरासरी केवळ २२.७५ आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघात दुखापतीची कोणतीही समस्या नसली तरी खेळाडूंना वनडेचा फारसा अनुभव नाही. वर्ल्ड कप २०१९ पासून, पाकिस्ताननं फक्त २९ वनडे सामने खेळले आहेत. तर भारतानं ५७ सामने खेळले आहेत. पाकिस्तानकडून यावर्षी बाबर आझम (६८९ धावा), फखर जमान (५९३ धावा) आणि इमामुल हक (३६१ धावा) या तिन्ही फलंदाजांनी सातत्याने धावा केल्या आहेत. उसामा मीर, सौद शकील आणि आगा सलमान मात्र सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयशी ठरले आहेत.

बुमराहचे पुनरागमन : धावगती वाढवण्याची जबाबदारी अनेकदा सातव्या क्रमांकाचा फलंदाज इफ्तिखार अहमद आणि आठव्या क्रमांकाचा फलंदाज शादाब खान यांच्यावर येऊन पडली आहे. इफ्तिखारनं नेपाळविरुद्ध शतक झळकावलं होतं. तर शादाबने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानविरुद्ध ४८ धावा केल्या होत्या. मधल्या फळीबाबत भारत आणि पाकिस्तानची स्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. गोलंदाजीत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णाच्या पुनरागमनामुळे भारतीय आक्रमण मजबूत झालं आहे. या दोघांनी आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत जोरदार गोलंदाजी केली. मात्र ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये ते कसं खेळतात हे पाहणं बाकी आहे. अशा स्थितीत मोहम्मद शमीला प्राधान्य दिलं जाऊ शकतं.

कुलदीप की अक्षर? : पाकिस्तानच्या शाहीन, नसीम आणि रौफ यांनी मिळून यावर्षी ४९ विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांची खरी कसोटी पल्लेकल्लेच्या उसळणाऱ्या खेळपट्टीवर असेल. फिरकीमध्ये रवींद्र जडेजाची निवड निश्चित आहे, जो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. भारताला कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. कुलदीपने यावर्षी ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत, तर अक्षरने सहा सामन्यांमध्ये केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या शादाबने आठ सामन्यांत ११ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? जाणून घ्या...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.