कॅंडी (श्रीलंका) : Ind Vs Pak Asia Cup 2023 : आशिया चषकात शनिवारी (२ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. श्रीलंकेच्या पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर दुपारी ३ वाजता सामन्याला सुरुवात होईल. जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. शनिवारी होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. सामन्यादरम्यान कॅंडीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कॅंडीमध्ये ७० टक्के पावसाची शक्यता : कँडी येथे शनिवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, दुपारी २.३० वाजता (टॉसच्या वेळी) पावसाची ७० टक्के शक्यता आहे. यामुळे टॉसलाही विलंब होऊ शकतो. सामना ३ वाजता सुरू होणार आहे. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पावसाची ६० टक्के शक्यता आहे. संपूर्ण सामन्यादरम्यान मैदानावर ढग असतील. त्यामुळे अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत डाव पूर्ण होणे अवघड असल्याचं बोललं जात आहे.
सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला फायदा होईल : एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू करून सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी किमान २० - २० षटकांचा सामना होणं आवश्यक आहे. पण जर सामन्याच्या वेळी सतत पाऊस पडत असेल आणि दोन्ही डावांत २० - २० षटक पूर्ण झाली नाहीत, तर अशा परिस्थितीत सामना रद्द केला जाईल. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल. यासह पाकिस्तानचे एकूण ३ गुण होतील आणि तो सुपर ४ साठी पात्र ठरेल. त्यानंतर भारताला सुपर ४ मध्ये पोहोचण्यासाठी नेपाळविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे.
कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो : सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. 'आशिया चषक स्पर्धेत सहा अत्यंत तुल्यबळ संघ आहेत. कोणीही कोणाला हरवू शकतो. पाकिस्ताननं अलीकडच्या काळात टी २० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगला खेळ केलाय. ते आमच्यापुढे चांगले आव्हान उभं करू शकतात, असं रोहित बोलताना म्हणाला.
हेही वाचा :