ETV Bharat / city

महाराष्ट्रात आज राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद

author img

By

Published : Oct 10, 2021, 7:55 PM IST

Updated : Oct 11, 2021, 12:32 AM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी आणि घटक पक्षांनी बंदचा नारा दिला असून शंभर टक्के बंद यशस्वी करण्यासाठी जोर लावला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, बाजारपेठा, उद्योग धंदे, व्यवसाय बंद राहणार आहेत.

मुंबई - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज (११ ऑक्टोबर) महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी आणि घटक पक्षांनी बंदचा नारा दिला असून शंभर टक्के बंद यशस्वी करण्यासाठी जोर लावला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, बाजारपेठा, उद्योग धंदे, व्यवसाय बंद राहणार आहेत. भाजप प्रणित संघटना वगळता संभाजी ब्रिग्रेड, डावे, कम्युनिस्ट, विविध संस्था, संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असून रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवणार आहेत. पुणे आणि मुंबईतील काही व्यापारी संघटना काळ्या फिती लावून दुकाने सुरू ठेवणार आहेत.

हेही वाचा - फ्लेमिंगो अभयारण्याबाबत निघणार नवी अधिसूचना; पुनर्विकासातील अडथळा दूर

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी शांततापूर्वक उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. या दरम्यान शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार घडला. यात ८ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देशभरात याचे तीव्र पडसाद उमटले. तरीही केंद्र सरकारने कारवाई करण्यात दिरंगाई केली. कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. केंद्र सरकारच्या आडमुठी कारभाराविरोधात सोशल मीडियातून टीकास्त्र सोडण्यात आले. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला असून या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

शिवसेनेने बंदमध्ये ताकदीने उतरणार

महाविकास आघाडीकडून घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सोमवारी बंद पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मुख्य पक्ष आणि इतर घटक पक्षांचा पाठींबा असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. विशेषतः शिवसेनेने या बंदमध्ये ताकदीने उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. तशी तयारीही राज्यभरात करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे, शेतकर्‍यांचे शेकडो बळी जाऊनही त्याची दखल न घेणे आणि आता शेतकर्‍यांच्या अंगावर दिवसाढवळ्या गाडी घालून त्यांना चिरडणे या गोष्टी लोकशाहीसाठी अत्यंत मारक आहे. देशातल्या जनतेला जागे करण्याची वेळ आली आहे. यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी केले आहे. मध्यरात्रीपासून बंदला सुरुवात होणार आहे. बंद १०० टक्के यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

निदर्शने, आंदोलन करून निषेध नोंदवणार

बंदमध्ये शिवसेनाही उतरणार असल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कडकडीत बंद पाळला जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने पक्षांचे वर्चस्व असलेल्या विभागात जोरदार तयारी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपप्रणित संघटनांच्या रिक्षा, टॅक्सी सुरू राहणार

मुंबई, ठाण्यातील भाजपप्रणित रिक्षा - टॅक्सी संघटनांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जबरदस्ती झाल्यास नुकसान होऊ नये यासाठी रिक्षा, टॅक्सी बंद ठेवल्या जातील, असे रिक्षा - टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

राजभवन येथे काँग्रेसचे मूक आंदोलन

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने करून निषेध नोंदवला जाणार आहे. काँग्रेसतर्फे राजभवन येथे मूक आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

अत्यावश्यक सेवा वगळणार

महाराष्ट्र बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. यात मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका, हॉस्पिटल, दूध वाहतूक, भाजीपाला आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार आहेत.

बेस्टही बंदमध्ये सहभागी होणार

भाजप वगळता शिवसेना व इतर संघटणा प्रणित बेस्ट बसेस, रिक्षा, टॅक्सी संघटणा बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शिवसेनेची युनियन असलेल्या बेस्ट, रिक्षा, टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

काळ्या फिती लावून करणार निषेध

कोरोनामुळे आधीच व्यवसायाला फटका बसला आहे. दुकाने - व्यवसाय यामुळे बंद ठेवता येणार नाहीत. मात्र, झालेला प्रकार निषेधार्थ आहे. काळ्या फिती लावून आम्ही निषेध नोंदवणार आहोत, असे व्यापारी संघटनेचे विरेन शहा यांनी सांगितले.

हेही वाचा - अमिताभ बच्चनने SBIला दिली भाड्याने जागा! मिळणार इतके भाडे...

Last Updated :Oct 11, 2021, 12:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.