ETV Bharat / city

Devendra Fadnavis Reply CM : पोलीस राज्य सरकारचे घरगडी आहेत का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

author img

By

Published : Mar 25, 2022, 9:38 PM IST

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

उद्धव ठाकरे यांनी ईडी म्हणजे भाजपाची घरगडी झाल्याचा टोला लगावला होता. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. पोलीस राज्य सरकारचे घरगडी झाले आहेत का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला ( Devendra Fadnavis On CM ) आहे.

मुंबई - या संपूर्ण अधिवेशनात राज्य सरकारने एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. जनतेचे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडले. मात्र, कोणत्याच प्रश्नाला राज्य सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली Devendra Fadnavis On CM ) आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस आज होता. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर हल्ला चढवला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही समोर आणले. तसेच सरकारी वकील कशाप्रकारे विरोधी पक्ष नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात, याबाबतचा पेन ड्राईव्ह आम्ही विधानसभेत दाखवला. या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत व्हावा, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देऊन हा तपास दाबण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

महत्त्वाच्या योजना बंद केल्या - मराठवाडा आणि विदर्भासाठी असलेल्या वैधानिक विकास महामंडळ राज्य सरकारने गुंडाळले. तसेच, मराठवाड्यासाठी अति महत्त्वाची असणारी वॉटर ग्रीड पाण्याची योजना देखील राज्य सरकारने बंद केली आहे. याचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेला बसणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

एसटी आणि विजेचा प्रश्‍न प्रलंबित - अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वीपासून राज्यात असलेला विजेचा आणि एसटी विलीनीकरणाचा प्रश्न लावून धरला होता. मात्र, विजेच्या मुद्द्यावर देखील राज्य सरकारने तोडगा काढलेला नाही. तिथेच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील अजूनही प्रलंबित आहे. गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे ग्रामीण भागात 10 ते 12 किलोमीटरची पायपीट विद्यार्थ्यांना आणि सामान्य जनतेला करावी लागते. पण, यावर राज्य सरकार चकार शब्द काढत नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांची मतांसाठी लाचारी - मुख्यमंत्र्यांनी आम्ही उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलेले नाही. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याऐवजी मुख्यमंत्री नवाब मलिक यांचे समर्थन करत आहेत. ही मतांची लाचारी असून, मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा आज जनतेसमोर आला आहे. मुख्यमंत्री आपल्याला तुरुंगात टाका, असे भावनिक भाषण करत आहेत. पण, कोण कोणाला तुरुंगात टाकू शकत नाही. ज्याने अपराध केला असेल त्याला तुरुंगात जावे लागेल. मुख्यमंत्री केवळ भावनिक भाषण करत असून हे भाषण विधानसभेतील भाषण नसून शिवाजी पार्कवरील भाषण वाटत होते. तसेच, आपण विरोधी पक्ष नेते म्हणून उत्तम काम करत आहोत. मात्र, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम करावे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

मग पोलीस तुमचे घरगडी का? - सध्या परस्थिती अशी झाली आहे की, ईडी म्हणजे भाजपाची घरगडी झाला असल्याचा टोला भाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला लगावला होता. परंतु, विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. यासाठी पोलिसांचा वापर केला जातो. मग पोलीस राज्य सरकारचे घरगडी झाले आहेत का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Yogi Adityanath Oath : योगी आदित्यनाथ यांच्यासह 52 मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.