ETV Bharat / briefs

ऐच्छिक ठिकाण तर दूरच, कुठेही द्या, पण बदली करा; कार्यकाळ संपूनही बदली न झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची 'मूक हाक'

author img

By

Published : Oct 3, 2020, 8:43 PM IST

गडचिरोली जिल्ह्यातील अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या 149 पोलिस उपनिरीक्षक व 31 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि काही पोलीस निरीक्षक व उपअधीक्षक बदलीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बदली करून देण्यात यावी अशी मागणी येथील पोलीस अधिकारी करत आहेत.

Police officers in gadchiroli demanding for transfer to other places
Police officers in gadchiroli demanding for transfer to other places

गडचिरोली - सध्या राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. तरी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक संवर्गातील बदल्या अद्यापही रखडल्या आहेत. त्यामुळे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही ऐच्छिक बदलीसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने येथे कार्यरत अनेक पोलिस अधिकाऱ्यांची मानसिकता ढासळली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बदली करण्याची मागणी येथील पोलीस अधिकारी करत आहेत.

राज्यामध्ये पोलिस विभागासाठी सर्वाधिक धोकादायक सेवा म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सेवेकडेे पाहिले जाते. कोणत्याही परिस्थितीसाठी सदैव तत्पर रहावे लागणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा खडतर काळ पूर्ण केल्यानंतर ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्याची तरतूद राज्य शासनाने केली आहे. मात्र सद्यस्थितीत ऐच्छिक ठिकाण तर दूरच, कुठेही द्या, पण बदली करा अशी 'मूक हाक' मारण्याची वेळ येथे कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांवर आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील चार तालुके वगळता आठ तालुके नक्षल कारवायांसाठी अतिसंवेदनशील आहेत. नक्षलविरोधी अभियानासाठी नव्या दमाचे तरुण अधिकारी हवे म्हणून नवे प्रशिक्षित पोलीस उपनिरीक्षक यांची संपूर्ण तुकडीच दर दोन ते अडीच वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यात सेवेसाठी पाठवली जाते. याशिवाय सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील बहुतांश अधिकाऱ्यांना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात सेवा द्यावी लागते.

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या 149 पोलिस उपनिरीक्षक व 31 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि काही पोलीस निरीक्षक व उपअधीक्षक बदलीची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र सुरुवातीला आलेल्या कोरोना संकटामुळे त्यांची बदल्यांची फाईल थांबवण्यात आली. आता राज्यातील पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवण्यात आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांची मानसिक ढासळत चालली आहे.

जिल्ह्यात कार्यरत अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण झाला. त्यानंतर 31 जुलैपर्यंत बदली होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. त्यानंतर 5 आगस्ट, 10 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 30 सप्टेंबर आणि आता 15 ऑक्टोबरला बदल्यांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. बदल्या करायचे असतील तर लवकर कराव्यात, नाहीतर यावर्षी होणारच नाही, असे स्पष्टपणे सांगावे. म्हणजे आम्ही व आमचे कुटूंबीय येथे राहण्याची मानसिकता बनवू, अशी प्रतिक्रिया येथील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.