ETV Bharat / bharat

'महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील'

author img

By

Published : Dec 5, 2020, 5:01 PM IST

Updated : Dec 5, 2020, 5:29 PM IST

भाजपा महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सिरोही जिल्ह्यातील शिवगंज येथे नूतन काँग्रेस कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

file pic
संग्रहित छायाचित्र

जयपूर - भाजपा महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सिरोही जिल्ह्यातील शिवगंज येथे नूतन काँग्रेस कार्यालयाच्या उद्धाटनासाठी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातील सरकार खाली खेचण्याच्या प्रयत्न

यावेळी बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज देशातील लोकशाही धोक्यात आहे. देशात कोठेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही. केंद्र सरकार आणि भाजपा पक्ष लोकांना धर्माच्या नावावर भडकावत आहेत. शेतकरी थंडीमध्ये दिल्लीत आंदोलन करत आहे, तरीही सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. राजस्थानातही निवडून आलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी प्रयत्न केला गेला. मात्र, आम्ही त्यांचा विरोध केला. आता पुन्हा आमचे आणि महाराष्ट्रातील सरकार खाली खेचण्याच्या प्रयत्नात भाजपा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक काँग्रेसशासित राज्यात कट आखून सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. येत्या काळात महाराष्ट्रातही असे कारस्थान दिसू शकते.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत

कुठे सरदार पटेल आणि कुठे अमित शाह

गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या ज्या तीन आमदारांनी अमित शाह यांची भेट घेतली होती, त्यांनी मला सांगितले की, कुठे सरदार पटेल आणि कुठे गृहमंत्री अमित शाह. गृहमंत्र्याच्या खुर्चीवर शाहा यांना पाहून आम्हाला लाज वाटली. चर्चेवेळी अमित शाह आम्हाला मिठाई आणि इतर पदार्थ खायला देत होते. आम्हाला खूष करण्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न सुरू होते, असे या तीन आमदारांनी सांगितल्याचे गेहलोत म्हणाले.

यावर्षी जुलै महिन्यातही केला होता भाजपावर आरोप

यावर्षी जुलै महिन्यात राजस्थानात सत्तापेच निर्माण झाला होता. काँग्रेस तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी गेहलोत सरकारवर नाराजी दाखवत बंडखोरी केली होती. मात्र, राजीनामा दिला नव्हता. त्यावेळी भाजपा काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी आमदारांची पळवापळवी करत असल्याचा आरोप गेहलोत यांनी भाजपावर केला होता.

आमदार खरेदी प्रकरण

काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपावर केला होता. एक ऑडिओ क्लिपही पुढे आली होती. त्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांना पक्ष सोडण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याचे वक्तव्य होते. आमदार खरेदी प्रकरणी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी 8 सदस्यांची विशेष टीम गठित केली होती. भाजपाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या सर्व गोंधळात गेहलोत सरकार टिकून राहिले.

Last Updated :Dec 5, 2020, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.