ETV Bharat / bharat

Bail To Varvara Rao: डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव

author img

By

Published : Aug 10, 2022, 3:46 PM IST

Updated : Aug 10, 2022, 4:53 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ. पी वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला. ( Bail To Varvara Rao ) वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2021 मध्ये राव यांना तात्पुरता जामीन दिला होता. मात्र, त्यानंतर कायमचा जामीन देण्यास नकार दिला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने वरवरा राव यांना जामीन दिला.
डॉ. पी वरवरा राव
डॉ. पी वरवरा राव

नवी दिल्ली - कवी डॉ. पी वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवार (दि. 10 ऑगस्ट) रोजी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) वरवरा राव ( Dr. P Varavara Rao ) यांना नियमित जामीन मिळाला आहे. वरवरा राव यांचे वय आणि आजारपण लक्षात घेता त्यांना जामीन मिळाला पाहिजे असे मत न्यायालयाने नोदंवले आहे. भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले 82 वर्षीय वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन वाढवला होता. त्यावर आता सुनावणी होऊन कोर्टाकडून राव यांना जामीन मिळाला आहे.

डॉ. पी वरवरा राव जामीन मंजूर
डॉ. पी वरवरा राव जामीन मंजूर

वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली - सर्वोच्च न्यायालयाने (2018)च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ. पी. वरावरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव नियमित जामीन मंजूर केला आहे. ( Supreme Court of India ) या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली होती. (Bhima Koregaon Case) या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला, असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला - जुलै २०२०मध्ये राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्यूशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते. ८१ वर्षांचे राव यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ( When was Varvara Rao arrested? ) त्यांना कोरोना झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने राव यांना जामीन दिला नव्हता. यामुळे राव यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

काय आहे प्रकरण? - 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकर्त्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला कवी वरवरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली होती.

कोण आहेत वरवरा राव - वरवरा राव हे मूळचे तेलंगणातील वारंगलचे असून ते माओवाद्यांचे सहानुभूतीदार, कवी आणि पत्रकार आहेत. ( Who is Varvara Rao? ) मार्क्सवादी समीक्षक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते आहेत. राव यांनी नवउदारवादी राज्याचा निषेध करणारे अनेक लेख लिहिले आणि सार्वजनिक सभांना संबोधित केले आहे. माओवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी 'विरासम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारी लेखक संघाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक कार्यकर्ते असण्यासोबतच राव हे एक उत्तम कवी देखील आहेत, त्यांचे 15 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 1957 पासून ते कविता लिहित आहेत. ते तेलुगू साहित्यातील उत्कृष्ट समीक्षकांपैकी एक मानले जातात.

1973 मध्ये पहिली अटक - आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राव यांना भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणात अटक होण्यापूर्वीच अनेक प्रसंगी अटक करण्यात आली आहे. त्यांची पहिली अटक 1973 मध्ये झाली होती. त्यानंतर वरवरा राव यांना आंध्र प्रदेशमध्ये अंतर्गत सुरक्षा कायद्याअंतर्गत (MISA) अटक करण्यात आली. आणीबाणीच्या काळात त्यांना अटकही करण्यात आली होती, आणि त्यांच्यावर कडक पाळत ठेवण्यात आली होती.

सत्तापालटाच्या आरोपाखाली अटक - आणीबाणीच्या काळात सुटलेल्या इतर कैद्यांच्या विपरीत, राव यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना आणखी एक आठवडा तुरुंगात ठेवण्यात आले. आणीबाणीनंतर अनेक वेळा त्यांचे प्राण वाचले. सिकंदराबाद कट प्रकरणात, आंध्र प्रदेश सरकार उलथून टाकण्याचा कट रचल्याबद्दल राव यांच्यासह ४६ आरोपींना अटक करण्यात आली होती. 1985 मध्ये त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली होती. वरवरा राव, ज्यांनी तेलुगू साहित्यात एमए केले आहे, ते रामनगर षड्यंत्र प्रकरणातही आरोपी होते, जिथे आंध्र प्रदेशचे पोलीस कॉन्स्टेबल संबैया आणि इन्स्पेक्टर यादगिरी रेड्डी यांना मारण्याची योजना आखलेल्या बैठकीत भाग घेतल्याचा आरोप होता. 17 वर्षांनंतर 2003 मध्ये त्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली.

पीपल्स वॉर ग्रुपचे दूत - राव हे चंद्राबाबू नायडू सरकारने ९० च्या दशकात स्वीकारलेल्या जागतिकीकरणाच्या धोरणांचे कट्टर विरोधक होते. आंध्र प्रदेश सरकार आणि नक्षलवादी यांच्यातील शांतता चर्चेत ते पीपल्स वॉर ग्रुपच्या वतीने दूत म्हणून गेले होते. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर त्यांच्या विरासम या संस्थेवर बंदी घालण्यात आली. विरासमच्या बंदीनंतर वरवरा राव यांना २००५ मध्ये पुन्हा अटक करण्यात आली आणि २००६ मध्ये त्यांची सुटका झाली. 2014 मध्ये नवीन तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून त्याला चार वेळा अटक करण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2018 मध्ये अटक - ऑगस्ट 2018 मध्ये, माओवादी अतिरेक्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या संदर्भात 5 राज्यांमधील 8 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. राव व्यतिरिक्त अटक करण्यात आलेल्यांमध्ये गौतम नवलखा, सुधा भारद्वाज आणि त्यांची मुलगी अनु भारद्वाज यांचा समावेश आहे. एल्गार परिषद रॅली प्रकरणी पुणे पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग याला जून 2018 मध्ये नागपुरातून अटक केली, तेव्हा वरवरा राव यांचे नाव तपासात पुढे आले होते. गडलिंग यांच्याकडून एक पत्र जप्त करण्यात आले असून, त्यात वरवरा राव यांनी गडचिरोलीतील सूरजगड भागात नक्षलवादी हल्ल्याच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले होते. दरम्यान, 17 नोव्हेंबर 2018 रोजी पुणे पोलिसांनी भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणात त्याच्या हैदराबाद येथील राहत्या घरी त्याच्याशी संबंध असल्याबद्दल त्याला अटक केली.

हेही वाचा - नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

Last Updated :Aug 10, 2022, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.