महाराष्ट्र

maharashtra

आमचे 10 पैकी 8 उमेदवार जिंकणार, 2 उमेदवार तुम्ही शोधा - जयंत पाटील - Jayant Patil

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 4:19 PM IST

Jayant Patil : देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यात बारामती, शिरूर, नगर सह 10 जागांवर निवडणूक लढवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दहा उमेदवारांपैकी 8 उमेदवार यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत जिंकतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला. यावेळी त्यांना 2 जागांच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की, त्या दोन जागा आपणच शोधा असं वक्तव्य यावेळी त्यांनी केलं आहे.

Jayant Patil
जयंत पाटील

लोकसभा निवडणुकीविषयी भाकीत व्यक्त करताना जयंत पाटील

पुणेJayant Patil :पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज (25 एप्रिल) जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांच्या पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं आहे. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, भारतरत्न देण्याची मागणी करता येईल तो जाहीरनाम्याचा विषय नाही. आमची ती फक्त मागणी आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची संपूर्ण राज्याची मागणी आहे. पण ⁠प्रॅाब्लेम असा आहे की, दिल्लीत त्यांचं ऐकत नाही, असं म्हणत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. एकनाथ खडसे आता तुमच्या पक्षात आहे का? याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, एकनाथ खडसे आमच्याकडून गेले आहेत. त्यांनी आमच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांनी तर जाहीररीत्या तसं सांगितलं होतं. आता ते आमच्या पक्षात नाही, असं यावेळी पाटील म्हणाले.

छगन भुजबळांबद्दल काय म्हणाले जयंत पाटील?:अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आमच्याशी काहीही चर्चा सुरू नाही; पण त्यांची तिथं महायुतीत अवहेलना होत आहे असं दिसत आहे. त्याबाबत आम्हालाही खेद वाटत आहे. दिल्लीने सूचना केल्या म्हणून ते नाशिक मधून उभे राहणार अशी चर्चा सुरू झाली आणि मग ऐन वेळी त्यांना माघार घ्यावी लागली. एक जुने सहकारी म्हणून आम्हाला त्याबाबत खेद वाटत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

भाजपाचा पराभव होणं अवघड - जयंत पाटील :राष्ट्रवादीकडून भाजपा सोबत जाण्यासाठी तीन वेळा प्रयत्न झाला, असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, पवार साहेबांना काही लोकं 5 ते 6 वर्ष सतत सांगत होते की, या देशात आता भाजपाचा पराभव होणं अवघड आहे. आपण तिथं जाणं आवश्यक आहे. तसेच त्यांची खासगीतील काही कारणे होती. सातत्याने काही लोकं भाजपा बरोबर जाण्यासाठी सांगत होते; पण पवार साहेब ठाम होते. पवार साहेब यांनी कधीच भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा घेऊन ते पुढे जात आहे, असं यावेळी पाटील म्हणाले. पार्थ पवार यांना जे संरक्षण देण्यात आले त्याबाबत पाटील यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, आमच्या मुलांवर आम्ही बोलत नाही. पण, मी गृहमंत्र्यांचे आभार मानेल. त्यांनी आमच्या मुलाला सिक्युरीटी दिली, असं म्हणत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा:

  1. आता लगबग मतदानाची: यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान - Lok Sabha Election 2024
  2. बारामतीत 'तुतारी' चिन्हावर दोन उमेदवार रिंगणात; काय आहे नेमका मॅटर? - Lok Sabha Election 2024
  3. अग्नीवीरसह कंत्राटी नोकर भरती रद्द करणार...राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानं जाहीरनाम्यात काय दिली आहेत आश्वासनं? - NCP SCP releases manifesto

ABOUT THE AUTHOR

...view details