महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole On BRS : तेलंगाणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा, लवकरच पोलखोल करणार-नाना पटोले

By

Published : Jun 27, 2023, 8:07 AM IST

Updated : Jun 27, 2023, 8:31 AM IST

भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून तिचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. बीआरएस पॅटर्न हा गुजरात पॅटर्न सारखाच फसवा पॅटर्न असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Nana Patole On BRS
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर तेलंगाणा राज्यातील बीआरएस पक्षाचा कोणताही परिणाम होणार नसून, बीआरएस पक्ष भारतीय जनता पार्टीची बी टीम असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला ठाऊक असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. बीआरएस पक्षांमधील अनेक नेते सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगाणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा असून लवकरच तेलंगाणा पॅटर्नची पोलखोल करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेसचे सरकार यावे ही वारकऱ्यांची अपेक्षा :भारत राष्ट्र समिती हा पक्ष राज्यातील राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. तेलंगाणात नऊ वर्ष केसीआर यांनी जनतेची कोणतीही कामे केली नाहीत. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी भरीव काम केले नाही. फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा बीआरएस पक्ष पिटत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला .

वारीवरून राजकारण करणे कितपत योग्य :पंढरपूर आषाढीवारी वरून राजकारण करू नये. हैदराबादहून तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर 600 गाड्यांचा ताफा घेऊन येत आहेत. पंढरपुरात आषाढी वारीला 10 लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे कितपत योग्य आहे, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे. त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबई पाण्यात मग कोट्यवधी रुपये गेले कुठे :शिंदे-फडणीस सरकार हे घोषणाबाज व जाहीरातबाज सरकार आहे. फक्त गाजावाजा करणे याचा परिणाम मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पाणी साचून मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. 6 मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले, पण मुंबई पाण्यात गेलीच, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

ओबीसी प्रदेशाध्यक्षपद देणार ही अतिशय चांगली गोष्ट :राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष पदासाठी ओबीसीचा चेहरा देऊ पाहत आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षांमध्ये कॉम्बिनेशन बनवले आहे, ओबीसी आणि मराठा अशाच प्रकारचा कॉम्बिनेशन राष्ट्रवादी करणार आहे. यामुळे काँग्रेसला फटका बसेल का असा सवाल नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीने ओबीसी प्रदेशाध्यक्ष दिल्यास ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Nana Patole : ...म्हणून राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
  2. Chandrasekhar Bawankule : वारीत नाना पटोलेंचा फ्लेक्स दिसताच बावनकुळेंची टीका, म्हणाले महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री
  3. Nana Patole criticized CM: भ्रष्टाचाराचे पैसे मोजण्यासाठी सुट्टी घेतली- नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
Last Updated :Jun 27, 2023, 8:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details