महाराष्ट्र

maharashtra

Karnataka Election Result 2023 : भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेने समोर आणला, नाना पटोलेंची कर्नाटक निकालानंतर खोचक टीका

By

Published : May 13, 2023, 2:20 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेचा काँग्रेसला फायदा झाल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

Nana Patole Criticize To BJP
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. कर्नाटकात राहुल गांधी यांच्या यात्रेचा फायदा झाला. कर्नाटकच्या जनतेने भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आणल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मागच्या वर्षीसुद्वा आम्हाला काठावर बहुमत दिल होते. लिंगायत समाजाच्या जोरावर भाजप पक्ष निवडून आला होता. मात्र त्याच लिंगायत समाजाला वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे त्यांना तिथल्या जनतेने वाळीत टाकले. कर्नाटकात 124 च्यावर जागा सुशिक्षित मतदारांनी काँग्रेसला दिल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

राहुल गांधींच्या यात्रेचा फायदा झाला :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 121 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपने राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचे पाप केले. राहुल गांधींना भाजपने बेघर केले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. मला स्वतःला 91 शिव्या घातल्या असे मोदी म्हणतात, मात्र गांधी कुटुंबियांवर किती शिव्या दिल्या यावर पुस्तक निघेल. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतो. राहुल गांधी शिकलेले आहेत, आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नसल्याचा टोलाही नाना पटोले यांनी यावेळी लगावला.

अजित पवारांना माझी योग्यता कळली :नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यावर त्यांना माझी योग्यता कळाली, ते माझे कौतुक करत आहेत, याबाबत मी त्यांना धन्यवाद देतो. उलट त्यांनी एक वर्ष आमचा अध्यक्ष का होऊ दिला नाही, याचे उत्तर द्यावे असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी केला. तत्कालीन उपाध्यक्षांनी त्या 16 आमदारांना अपात्र का केले नाही? याचा उत्तर त्यांनी द्यावे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

तर शिंगावर घेऊ, नाना पटोलेंचा संजय राऊतांना इशारा :महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता कोणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ असे उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. आता आमच्यावर कोणी बोलत नाही, सकाळी नऊ वाजता लाईव्हमध्ये देखील आमचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळे आता आमच्यावर कोणीही बोलणार नाही असे वाटते असा टोला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला. कोणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा इशाराही त्यांनी दिल्याने महाविकास आघाडीत सारे काीह आलबेल नसल्याचे दिसून आले.

आताचे सरकार हे बेकायदेशीर :आताचे सरकार हे बेकायदेशीर असल्याबाबत आपण तेव्हाच मत व्यक्त केले होते. नैतिकतेच्या गोष्टी गेल्या दोन दिवसांपासून सर्वच करत आहेत. मात्र सकाळचा शपथविधी करणे ही पण नैतिकता होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे भाजपने नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगू नये. मुळात ती काय असते हेच यांना माहिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाविरोधात ताकतीने लढायला तयार असलेल्यांना आम्ही सोबत घेऊन जाऊ, अशी आमची भूमिका आहे. काँग्रेससाठी सत्ता दुय्यम विषय असून आधी देश आणि संविधान आहे. उद्या काँग्रेसचे सरकार आले तर भ्रष्टाचार संपवायला वेळ लागणार नाही. सर्व भ्रष्टाचारी भाजपच्या पिंजऱ्यात अडकल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे त्यांना पकडणे सोपे झाल्याची टोलेबाजीही नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा -

  1. Narvekar On MLAs Disqualification : 'त्या' आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही : राहुल नार्वेकर
  2. Sachin Tendulkar : वैद्यकीय उत्पादनाच्या जाहिरातीत अवैधपणे वापरले सचिन तेंडुलकरचे नाव, गुन्हा दाखल
  3. CBI Raid On Sameer Wankhede : 25 कोटी लाचप्रकरण; समीर वानखेडेंच्या घरी दुसऱ्या दिवशीही सीबीआयची छापेमारी सुरूच

ABOUT THE AUTHOR

...view details