मुंबई -राज्यसभा निवडणुकीच्या ( Rajya Sabha Election 2022 ) पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. फारसे महत्त्व नसलेले अपक्ष अचानक चलतीत आले आहेत. पक्षातील आमदारांनी शेवटच्या क्षणी धोका देऊ नये, यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी एक प्रकारे स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आजमीतिला सत्ताधारी पक्षातील कोणत्याही घटक पक्षाकडे आमदारांवर शिस्तभंगाची अथवा निलंबनाची कारवाई करावी एवढी क्षमता नाही याचाच फायदा आमदार घेतील, अशी भीती या सर्व पक्षांना वाटत आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
आमदार फुटण्याची भीती -राज्यसभेची सहावी जागा सत्ताधारी आणि विरोधक यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या जागेसंदर्भात राज्यात असलेल्या महाविकासआघाडी घटक पक्षातील आमदारांना संबंधित पक्षांनी एकत्र जमवून हॉटेलमध्ये निवडणुकीपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक राज्यसभेसाठी अशा पद्धतीने पहिल्यांदाच लॉबिंग होत आहे. आपल्या पक्षाच्या आमदारांना फोडण्याची भीती ही राजकीय पक्षांमध्ये असल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत मतदान दाखवून करण्यात येणार असल्याने व्हीप लागू करण्याची गरज भासणार नाही. मात्र, अपक्ष आमदार या निवडणुकीत अत्यंत निर्णायक भूमिका बजावणार आहेत.