मुंबई महाराष्ट्रासह देशभरात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे. लंपी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 2346 जनावरांना लंपी रोगाची लागण झाली. तर 1435 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे. या आजारामुळे 42 जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय बरकाळे यांनी दिली.
असा ओळखावा आजारलंपी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. हा आजार फक्त गाय आणि म्हैशींनाच होतो. या आजारात गाई म्हशींना 104-105 फॅरेनाईट ताप येतो. त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध कमी होते. तसेच कष्टाळू म्हणजे बैलासारख्या प्राण्यांना अशक्तपणा येतो. अनेकदा जनावरे लंगडतात देखील आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जनावरांच्या अंगावर मोठ मोठ्या गाठी येतात. या गाठी कासेला मानेवरती अशा मऊ ठिकाणी येतात. तसेच त्या सर्वांगावर देखील पसरू शकतात. एवढेच नाही तर जनावरांच्या अंतर्गत भागांमध्ये देखील गाठी येतात.
या नंबरवर संपर्क साधालंपी पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ अथवा राज्यातील कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन बरकाळे यांनी केले.
ठाणे जिल्ह्यात लंपी रोगाचा शिरकावराज्यातील ग्रामीण भागात लंपी रोगाने अक्षरशः थैमान घातले असून ठाणे जिल्ह्यातही या रोगाचा शिरकाव होऊन डझनभर जनावरांना लागण झाल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील तीन, अंबरनाथ तालुक्यातील एक आणि भिवंडी तालुक्यातील आठ जनावरांचा समावेश आहे.