महाराष्ट्र

maharashtra

'26/11' मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण; हल्ला झालेल्या ठिकाणची जाणून घ्या स्थिती

By

Published : Nov 26, 2020, 6:09 AM IST

Updated : Nov 26, 2020, 9:52 AM IST

देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मानले जाणाऱ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 197 नागरिक बळी पडले होते. तर सुमारे 600 नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलातील महत्त्वाचे अधिकारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले.

mumbai
मुंबई दहशतवादी हल्ला

मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री अचानक सुरू झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने मुंबई हादरली. २६/११ च्या या काळरात्री दहशतवाद्यांनी दोन हॉटेल, रेल्वे स्टेशन, रुग्णालय, ज्यूंचे प्रार्थनास्थळ छाबडा हाऊसवर हल्ला केला. सुरवातीला कुणाला हा हल्ला एवढा मोठा असेल असं वाटलं नाही. पण बघता बघता जगभरात या हल्ल्याचे गांभीर्य पसरले.

या हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीवरील हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या स्मरणात आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मानले जाणाऱ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 197 नागरिक बळी पडले होते. तर सुमारे 600 नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलातील महत्त्वाचे अधिकारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झाले.

महेश बागल प्रतिनिधी

खालील टॉप 5 ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती

1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी)

मुंबईतील हे सर्वात गर्दीचे रेल्वे स्टेशन आहे. 26 नोव्हेंबरला लिओपोल्डवर हल्ला सुरू असतानाच दहशतवाद्यांच्या दुसऱ्या एका गटाने सीएसटीतही गोळीबार सुरू केला. या रेल्वे स्टेशनवरून त्या दिवशीही आपापल्या ठिकाणांवर जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी केली होती. या गर्दीलाच लक्ष करत दोन दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या ठिकाणी 58 लोकांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 100 हून अधिक जण यात जखमी झाले होते.

लिओपोल्ड कॅफे

2) हॉटेल ऑबेरॉय ट्रायडेंट

लिओपोल्ड कॅफे, सीएसटीवरच्या हल्ल्याची तीव्रता कळेपर्यंत दहशतवाद्यांनी ऑबेरॉय हॉटेलमधेही गोळीबार सुरू केला. व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये त्यादिवशी जवळपास साडेतीनशेहून अधिक नागरिक हजर होते. यावेळी दहशतवाद्यांनी हॉटेलमधल्या लोकांना ओलिस ठेवले होते. येथे एनएसजीच्या कमांडोंनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याठिकाणी 30 जणांचा मृत्यू झाला होता.

हॉटेल ऑबेरॉय ट्रायडेंट

3) हॉटेल ताज

गेट वे ऑफ इंडियाजवळच्या ताज हॉटेललाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. समुद्राशेजारच्या या हॉटेलमधल्या घातपातानंतरच या हल्ल्याची जगाला तीव्रता कळाली. नंतर ताज हॉटेलमधून धुराचे लोळ दिसू लागले होते. परदेशी पर्यटक, अधिकारी या हॉटेलमध्ये होते. ताज हॉटेलमधल्या या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच पोलिसांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

हॉटेल ताज

4) छाबडा हाऊस

दोन दहशतवाद्यांनी नरीमन पॉइंट येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ छाबडा हाऊस ताब्यात घेतले. अनेकांना ओलिस ठेवले होते. कित्येक तासांच्या चकमकीनंतर एनएसजी कमांडोंनी दहशतवाद्यांचा याठिकाणी खात्मा केला. येथील इमारतीवर हॅलिकॉप्टरद्वारे एनएनसजी कमांडोंना उतरवण्यात आले. नंतर या कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले.

छाबडा हाऊस

5) लिओपोल्ड कॅफे

परदेशी पर्यटकांची रेलचेल असलेल्या लिओपोल्ड कॅफेवर दहशतवाद्यांनी पहिल्यांदा गोळीबार केला. काही कळण्याच्या आधीच दहशतवाद्यांनी येथे गोळीबार करून तिथून ते पळून गेले. लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण मारले गेले.

Last Updated : Nov 26, 2020, 9:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details