ETV Bharat / state

चायनीजची ऑर्डर देऊन आलोय निघावं लागेल...; लठ्ठपणा दिनाच्या चर्चासत्रात राज ठाकरे यांचा टोला - World Obesity Day 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 10:08 PM IST

World Obesity Day 2024 : जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त लहान मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर मुंबईत विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे जे म्हणाले ते ऐकून आयोजकांनी कपाळावर हात मारुन घेतला असेल. वाचा आणि ऐका...

World Obesity Day 2024
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Mumbai Reporter)

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Mumbai Reporter)

मुंबई World Obesity Day 2024 : आज जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त मुंबईत "लहान मुलांमधील लठ्ठपणा" या विषयावर विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची विशेष मुलाखत जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाउंडेशनचे फाउंडर प्रोफेसर संजय बोरुडे यांनी घेतली. लठ्ठपणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकारणातील दोन लठ्ठ व्यक्तींची ही विशेष मुलाखत होती. याप्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी लठ्ठपणाबाबत सरकारी उपाययोजनावर माहिती दिली. तर राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत बेधडक उत्तरं दिली.


मुलांमध्ये लठ्ठपणा हा एक आजार : जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त लहान मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर मुंबईत विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी लहान मुलांमधील वाढत चाललेला लठ्ठपणा या विषयावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या राज्यात याचे दोन भाग पाहायला मिळतात. एकीकडं कमी वजनाची कुपोषित बालक आहेत. परंतु याचं प्रमाण आता बरच कमी झालंय. कुपोषणावर सरकार विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून त्याचा परिणाम सुद्धा दिसून येत आहे. तर दुसरीकडं मुलांचा लठ्ठपणा हा विषय गंभीर होत चालला आहे. अर्बन लाईफ स्टाईलमध्ये हा विषय तयार झाला आहे. आयुष्यमान भारत ही योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलीय. त्यानंतर गरोदर महिलेपासून या सर्व गोष्टींची काळजी घेण्याचं काम सुरू आहे.

लठ्ठपणा हा एक आजार : केंद्र सरकारच्या वतीनं सुद्धा कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य योजना आहे. यामध्ये किशोरवयीन मुलं असून त्यांच्यावर मोठा फोकस सरकारनं केलाय. २०१४-१५ ला जो राष्ट्रीय सर्वे झाला. त्यात मुलांमध्ये लठ्ठपणा हा एक आजार म्हणून बळावत आहे, असं निर्दशनास आलं आहे. याकरता आता सर्व शाळांमध्ये दोन शिक्षिका ट्रेन करायच्या ज्यांना लहान मुलांच्या लठ्ठपणाबाबत, न्यूट्रिशनबाबत किंवा इतर काय उपाय योजना करू शकतात, याबाबत सर्व ज्ञान त्यांना असायला हवं. एखादा मुलगा लठ्ठपणाकडं जात आहे असेल तर त्या मुलाला कशा पद्धतीने कौन्सलिंग करता येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असल्याचं फडणवीस म्हणाले.



शाळांना मैदान असणं सक्तीचं : फडणवीस पुढे म्हणाले की, शाळांमध्ये खेळ असणं जरुरी आहे. म्हणून सर्व शाळांना मैदान असणं आम्ही सक्तीचं केलंय. फिजिकल ट्रेनिंग (PT) या विषयाला सुद्धा अभ्यासक्रमाचा एक भाग केलाय. अनेक मुलं मैदानावर जात नाहीत. शाळेत गेली तरच ती मैदानावर जातात. याकरता खेलो इंडिया यासारखी मोहीम सुरू करण्यात आलीय. हल्ली राष्ट्रीय खेळात मुलं जास्त सहभागी होतात, असंही फडणवीस म्हणाले. तसंच प्रत्येक वस्तूसाठी कॅलरी काउन्ट लिहिणं कम्पल्सरी करत आहोत. चौपाटीवरील स्टॉलवरसुद्धा त्यांनी कॅलरी काउन्ट लिहायचे. पॅक फुडवर न्यूट्रिशन व्हॅल्यू सर्व गोष्टी लिहाव्या लागतात. पंतप्रधान मोदी यांनी नवीन मोहीम हाती घेतली आहे. फास्ट फूडवरून सुपर फूड कसा तयार करता येईल. याकडंही लक्ष देत असल्याचं फडणवीस म्हणाले.



मला समजलं असतं तर मीच वजन कमी केलं असतं : या कार्यक्रमाला उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे लठ्ठपणा विषयावर काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लठ्ठपणा कसा कमी करायचा हे मला समजलं असत तर मीच वजन कमी केलं असतं. सुनेच्या रूपानं आमच्या घरात डॉक्टर आहे. पण माझं वजन कमी झालं नाही. मी दररोज टेनिस खेळतो त्याने माझी ४६० कॅलरीज बर्न होते. परंतु आजच्या काळात फास्ट फूड या गोष्टीमुळं हा आजार बळावतो आहे.

चायनीजची ऑर्डर दिली आहे : जपानमध्ये मी काही शाळा पाहिल्या. तिथे तुम्हाला डबा आणून देत नाहीत. तसंच इथेही मुलांना शाळेत चांगल अन्न मिळालं तर त्यांना तिथूनच सुरुवात होईल. परंतु माझी एक विनंती आहे की, मुलांच्या लठ्ठपणावर शाळेत ज्या शिक्षिका लक्ष देणार आहेत त्यासुद्धा बारीक असाव्यात, असा विनोदी टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. तसंच कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी दिल्लीला जायचं आहे आणि मी चायनीजची ऑर्डर दिली आहे, म्हणून कार्यक्रम आटोपता घ्यावा, हे त्यांनी सांगितल्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. संयोजकांना मात्र यामुळे कसंनुसं झाल्याचं दिसून आलं. या चर्चासत्रात राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानं राज ठाकरे यांना या विषयावर बोलावणं योग्य होतं की, अयोग्य? याचा विचार आयोजकांना पडला असेल.

हेही वाचा -

  1. पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवा; रवींद्र धंगेकर यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं मागणी - Pune Hit And Run Case
  2. बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात दाद मागणार, पुणे अपघातावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; तिघांना पोलीस कोठडी - Pune Porsche Hit And Run Case
  3. संथ गतीच्या मतदानावरून फडणवीस-ठाकरे आमनेसामने, कमी मतदानानं वाढवली धाकधूक - Low Voting Issue Mumbai
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.