ETV Bharat / state

मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकर त्रस्त, मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचं मौन - PM Modi Road Show

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 5:37 PM IST

PM Modi Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घाटकोपर विक्रोळी दरम्यान रोड शो केला. यावेळी अनेक मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागलं. मेट्रो काही काळासाठी बंद करण्यात आल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. या संदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र पंतप्रधानांच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली एवढचं सांगून मुंबईकरांच्या त्रासावर मौन पाळलं.

PM Modi Road Show
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Reporter)

मंत्री शंभूराज देसाई मोदींच्या रोडशो विषयी बोलताना (Reporter)

मुंबई PM Modi Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील रोड शो सफल आणि दिमाखदार झाला. त्यांना पाहण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी हजारो मुंबईकर उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर घरांच्या खिडक्यांमध्ये, गच्चीवर जिथे जागा मिळेल तिथे उभे होते. यावरून मुंबईतील वातावरण मोदीमय झाले आहे. आता मुंबईतील महायुतीच्या सर्वच जागा जिंकून येतील असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी आज (16 मे) मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

45 पार जाणारच : यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, जरी विरोधकांकडून काहीही पसरवले जात असले तरी एकूण राज्यातील वातावरण पाहता आम्ही निवडणुकीपूर्वी जे म्हणत होतो की, 45 पेक्षा अधिक जागा मिळतील तर आता आम्ही ठामपणे सांगू शकतो की, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा निश्चितच मिळतील.

मुंबईकरांच्या त्रासावर मौन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वरळी, विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान केलेल्या रोडशोसाठी हजारो नागरिक उपस्थित होते; मात्र याचवेळी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी काही मार्गांमध्ये बदल करण्यात आला होता तर काही मार्ग रोखून धरण्यात आले होते. यावेळी मेट्रो सुमारे 45 मिनिटे बंद होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. या संदर्भात विचारले असता शंभूराजे देसाई म्हणाले की, पंतप्रधानांना पाहण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षेसाठी काही मार्ग बंद करण्यात आले होते; पण त्यामुळे कोणाला त्रास द्यावा अशी अपेक्षा नव्हती; मात्र यापेक्षा अधिक त्यांनी या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्यांनी मुंबईकरांच्या त्रासाबद्दल मौन पाळणे पसंत केले.


मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या : विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात होते की, मुख्यमंत्री हे दौऱ्यावर असताना पैशाचे वाटप करत आहेत. त्यामुळे आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून निवडणूक आयोगाच्या तपासणीला प्रतिसाद देत आपल्या बॅगा दाखवल्या आहेत. मुख्यमंत्री हे प्रवासावर असताना तीन ते चार जोडी कपडे आणि अन्य साहित्य सोबत नेहमी घेतात; त्यामुळे त्यांच्यासोबत बॅगा असतात असे समर्थनही यावेळी देसाई यांनी केलं. तर संजय राऊत अलिकडे काय आरोप करतात याकडे आम्ही लक्षच देत नाही, असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. मुंबईत धार्मिक कार्यक्रमात भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन भोवलं; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल - lok sabha election 2024
  2. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल ; चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केला विश्वास, महालक्ष्मी मंदिरात घेतले आशीर्वाद - Chandrababu Naidu On NDA Gov
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी 41 जण मैदानात; निवडणूक विभागानं 33 उमेदवारांना दाखवला 'घरचा रस्ता' - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.