ETV Bharat / state

मराठा आरक्षणाच्या विधेयक मंजुरीनंतर सत्ताधारी नेत्यांमध्ये आनंद, विरोधकांना आरक्षण टिकण्याबाबत साशंकता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 6:04 PM IST

Updated : Feb 20, 2024, 8:01 PM IST

Maratha Reservation : राज्यातील शिंदे सरकारनं मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. या विधेयकामुळं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन आनंद व्यक्त केला आहे. तर, विरोधकांसह आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधेयकाबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation

मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणारे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी विधेयकाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. "आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण हवं आहे. उद्या आमच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल", असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. तसंच या बाबत विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला : "मराठा आरक्षण विधेयक आज दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं, ही अत्यंत समाधानाची, आनंदाची बाब आहे. मराठा समाजाचं मागासलेपण लक्षात घेता मराठा आरक्षण टिकणारं आहे. सर्वांच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या काही त्रुटी दूर करून हा प्रश्न सुटला आहे", अशी प्रतिक्रिया भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीय.

मराठा आरक्षणावर शंका : "मराठा आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज एकमतानं मंजूर करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्यात मराठा आरक्षणाची पूर्ण दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चे निघाल्यावर दिलेल्या आश्वासनानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते पूर्ण केलं. महत्त्वाची बाब म्हणजे आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, यापूर्वी हे आरक्षण रद्द करताना झालेल्या चुका दुरुस्त करून आरक्षण देण्यात आलं. त्यामुळं मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार आहे, असा दावा शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण : "महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी 'आरक्षण विधेयक 2024' विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मिळावं यासाठी आघाडी सरकार प्रयत्नशील होतं. आज महायुती सरकारनं लाखो मराठा बांधवांच्या मागण्यांना न्याय देत, मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर केलं", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी म्हटलं आहे.

आम्ही मराठा समाजाचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो त्यांना आता आरक्षण मिळालेलं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा हेतू शुद्ध आहे. तर मग यांनी विधेयकावर चर्चा का नाही घेतली? मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. या विधेयकात सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख करण्यात यावा. या मसुद्यात तो मुद्दा गहाळ आहे. त्यामुळे सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली, असं आम्हाला वाटतं-आमदार यशोमती ठाकूर

मराठा समाजाची निर्दयीपणे डोकी फोडली : "मराठा समाजातील सर्व माता भगिनींना मराठा आरक्षण विधेयकाचा कसा अभ्यास करण्यात आला, याबद्दल जाणून घ्याचंय. आज मंजूर करण्यात आलेलं मराठा आरक्षण विधेयक न्यायालयात टिकेल, अशी शक्यता आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी समाजाला मोठा संघर्ष करावा लागला. यापूर्वी मराठा समाजाची निर्दयीपणे डोकी फोडली गेली. मात्र, या आरक्षणामुळं किती रोजगार निर्माण होतील हे पाहणं बाकी आहे.", असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

'हे' वाचलंत का :

  1. शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात मराठा आरक्षण दिलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 'सगे-सोयरे'वर जरांगे पाटील ठाम
  2. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे, सरकारनं आमची फसवणूक केली - मनोज जरांगे पाटील
  3. मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर
Last Updated : Feb 20, 2024, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.