ETV Bharat / state

अखेर कळसुबाई शिखरावरील तो वादग्रस्त फलक हटवला, सर्व महिलांना आता मंदिर दर्शनासाठी खुले - Kalsubai Controversy board removed

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 5:37 PM IST

KALSUBAI PEAK CONTROVERSIAL board : अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई शिखरावर काही नागरिकांनी घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये या स्वरुपाचा फलक लावला होता. याची दखल त्याविरोधात सोशल मीडियावर महिलांनी रान उठवलं होतं. त्यानंतर तो वादग्रस्त फलक हटवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Kalsubai Peak Controversial Plaque
कळसुबाई फलक

अहमदनगर KALSUBAI PEAK CONTROVERSIAL board : महाराष्ट्रातील सर्वांत उंच समजलं जाणारं कळसुबाई शिखर हे महिलासांठी कायम स्वरूपी खुलं राहणार आहे. कळसुबाई शिखरावर महिलासंदर्भात लावलेला वादग्रस्त फलक तत्काळ हटविण्यात आला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली दखल : अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर समजले जाते. या शिखरावर काही मनुवादी विचारसरणीच्या नागरिकांनी घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये. विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात प्रवेश करू नये अशा सूचना लिहिलेल्या होत्या. हा फलक कळसुबाई शिखर चढण्यासाठी आलेले गिर्यारोहक आणि त्यांच्या मित्रांच्या लक्षात आला होता. त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत या फलकावरील सूचना सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे महिलांविरोधातील या नामफलकाचा सर्वत्र निषेध करण्यात येत होता. ही पोस्ट अकोलेचे राहुल भांगरे यांनी सोशल मीडियावर टाकत महिलांवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला होता. राहुल भांगरे यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही दखल घेत अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते.

शिखर सर्वांसाठी कायमस्वरूपी खुले : बारी येथील महिला सरपंच वैशाली खाडे आणि जहांगिरदार वाडीचे सरपंच पंढरी खाडे यांनी तत्काळ सदर घटनेची दखल घेत वादग्रस्त फलक शिखरावरून हटवला आहे. काही मनुवादी विचारसरणीच्या नागरिकांनी हा फलक लावला असल्याची माहिती समजत असून बारी, जहांगिरदारवाडी ग्रामपंचायत आणि गावकरी अशा विचारसरणीला पाठीशी घालत नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आदिवासी समाजामध्ये स्त्रीला मानाचं स्थान असून मनुष्याच्या जगण्यापासून ते मरेपर्यंत सर्व विधी ही स्त्रीच करते. त्यामुळे कळसुबाई शिखरावर आणि मंदिरात महिलांना कधीही बंदी घालण्यात आलेली नव्हती आणि येणारही नाही. सर्वांसाठी शिखर हे कायमस्वरूपी खुले होते आणि खुलेच असणार, असंही यावेळी सांगण्यात आलं.

मनुवादी विचारांना थारा नाही : आदिवासी समाजामध्ये मातृसत्ताक संस्कृती असल्याने अशा मनुवादी विचारसरणीला समाजात कुठेही थारा नाही. आदिवासी समाज पूर्वापार स्त्रियांना आदर आणि सन्मानाची वागणूक देत आला आहे. आदिवासी समाजात मूल जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हे सर्व विधी महिलांकडूनच केले जातात. हे असे फलक लावणे, दर्शवणे समाजाला अशोभनीय असल्याचं जहांगिरदार वाडीचे सरपंच पंढरी खाडे म्हणाले.

हेही वाचा :

  1. नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातच म्हणाले... - Navneet Rana
  2. संजय निरुपम यांनी आज घोषणा करण्यापूर्वीच काँग्रेसनं दाखवला घरचा रस्ता, 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी - Sanjay Nirupam News
  3. भाऊसाहेब वाकचौरे गद्दार असून त्यांना उमेदवारी दिल्यानं अपयश येण्याची शक्यता - उत्कर्षा रुपवते - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.