ETV Bharat / state

आग्रा येथे शिवजयंती उत्साहात साजरी; प्रतापगडाच्या संवर्धनासाठी पन्नास कोटींचा निधी, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 12:22 PM IST

CM Eknath Shinde On Agra Fort : आग्रा येथे शिवजयंती उत्साहात साजरी झाली.गडकिल्ले संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जगात आहे. शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचं काम शासनामार्फत सुरू आहे. प्रतापगड संवर्धन करण्यासाठी ५० कोटी रुपये दिले जातील. इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सर्किट तयार केलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय.

CM Eknath Shinde
आग्रा किल्ला

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर CM Eknath Shinde On Agra Fort : गड किल्याचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून प्रतापगड संवर्धन करण्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा प्रस्ताव दोन दिवसात मंजूर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रा येथे केली. महाराजांमुळे आज देशाचा इतिहास भूगोल चांगला आहे. आज महाराजांची जयंती देशात नाही तर विदेशात महाराजांची जयंती साजरी केली जात आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात महाराजांची जयंती जगभरात उत्साहात साजरी होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९४ व्या जन्ममहोत्सव सोहळात ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्ममहोत्सव साजरा : नागरीकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आगरा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्ममहोत्सव संपन्न झाला. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाणतर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सलग दुसऱ्या वर्षी आगरा येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगरा येथील सुटकेचा प्रसंग लेझर शोद्वारे दाखवण्यात आला. पाळणा, पोवाडे आणि शिवाजी राजांवर आधारित गाण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरातत्व विभागानं परवानगी देण्यास अनेक अडचणी आणल्या अशी खंत आयोजक विनोद पाटील यांनी व्यक्त केलीय. यावेळी सोहळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बघेल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आणि खासदार उदयन राजे भोसले, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.


उत्सवासाठी सजला लाल किल्ला : शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी लाल किल्ला सजला होता. सोहळ्यासाठी लाल किल्ल्यात २४ बाय ६० फुटाचे खास व्यासपीठ, लाल कार्पेट, आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रवेद्वारापासून ते मंचापर्यंत रेड कार्पेट टाकण्यात आलं होतं. लाल किल्ला १ हजार दिव्यांनी उजळवण्यात आला होता. किल्ल्याचं आकर्षण पाहून पर्यटक भारावून गेले होते. विदेशी पर्यटकांनीही सहभागी होत कॅमेरात हे क्षण टिपलं. लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ढोल, ताशांच्या गजरात सोहळ्याला सुरुवात झाली होती. सजवलेले घोडे, सजीव देखावे, घोड्यांवर मावळ्यांच्या वेशभूषेत बसलेले शालेय विद्यार्थी यांनी लक्ष वेधलं होतं. यावेळी शिवभक्तांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला होता. जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सोहळ्यात 'लेझर शो'नं आकर्षण वाढवलं होतं. आग्राहून सुटका या घटनाक्रमावर 'लेझर शो'च्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता. या कलात्मक अविष्काराला उपस्थितांनी जयघोषात दाद दिली. यासह संगीत सोहळा, शिवजन्म पाळणा, पारंपारिक कला प्रदर्शन याचं सादरीकरण करण्यात आलं.


आग्रा किल्ला कायम खुला असावा : अजिंठा वेरुळ लेणीमध्ये जगभरातील लोक येतात. मात्र महाराजांच्या जयंतीसाठी आगरा येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लाल किल्ल्यात येण्यासाठी बंदी का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी हा किल्ला नेहमीसाठी खुल करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय. सुरत, आग्रा अशा अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय.



गड किल्ल्यांचे सर्किट तयार करणार : छत्रपती शिवाजी महाराज अंतःकरणात सोबत देव्हाऱ्यात ही आहेत. "जे सगळ्या जगाने केले ते शिवाजी महाराजांनी केलं नाही आणि महाराजांनी जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही" असं गौरवोद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी काढलं. लोकांना अन्यायाच्या आणि गुलामांच्या तावडीतून सोडविण्याच काम त्यांनी केलं. गड किल्ल्यांना जोडणारे सर्किट बनविण्यात यावं. पंतप्रधान मोदींशी भेट झाली होती त्यात दिल्लीत शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी विनंती केल्याचं उदयनराजे यांनी सांगितलंय.


महाराजांचा आग्रा प्रवास अधोरेखित करणार : महाराजांना रणनीती, युद्ध निती माहिती होती. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर कुणीचं राहील नसतं, भारताचा इतिहास आणि भूगोल बदललं असता, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात जिथे जिथे गेलेत तिथे तिथे स्मारक झाले पाहिजे. प्रभू श्रीराम यांच्या वनवासात केलेला प्रवास अधोरेखित केला जात आहे. तसाच महाराजांचा आग्रा येथून सुटकेचा प्रवास दर्शवण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे अशी इच्छा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.



तालुका पातळीवर महाराजांचा इतिहास : शिवजयंती फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात होत आहे. रशियामध्ये देखील शिवजयंती साजरी झाली. त्यांच्याशी मी झूमवर बोललो, साता समुद्रापार महाराजांची कीर्ती पसरली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय जवांनानी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि पाकिस्तानच्या दिशेने शिवरायांच्या तलवारीचे टोक आहे. शत्रूला धडकी भरवण्यासाठी हे पुरेस आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक होते. त्यामुळं नौदलाच्या झेंड्यावर त्यांच्या आरमाराची प्रतिमा लावण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलाय. राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यभर आपण जिल्हा तालुका स्तरावर महाराजांचा इतिहास पोहोचला पाहिजे, म्हणून राज्य सरकार विशेष अभियान राबविणार अशी घोषणा, मुख्यमंत्री शिंदे यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. राज्यातील पाच गडकिल्ल्यांवरील मातीतून साकारली शिवरायांची मूर्ती; किल्ले संवर्धित ठेवण्याचा दिला संदेश
  2. शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत मोठं अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
  3. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पडला पार; शिवनेरी गडावर शिवप्रेमींची गर्दी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.