ETV Bharat / state

महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प परराज्यात, अंबादास दानवेंकडून सरकारवर आरोप - Ambadas Danve

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 5:14 PM IST

Ambadas Danve : महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना, आता आणखी एक प्रकल्प परराज्यात गेल्याचा जाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

Ambadas Danve
अंबादास दानवे (MH Desk)

मुंबई Ambadas Danve : राज्यात मागील दोन वर्षात म्हणजे मुख्यतः महायुतीच्या सरकारमध्ये राज्यातील प्रकल्प आणि उद्योगधंदे हे परराज्यात गेले आहेत. खासकरून महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे हे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर केला असताना, आता महाराष्ट्रातील हक्काचा आणखी एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केलाय. एक्सवरून पोस्ट करत अंबादास दानवे यांनी हा सरकारवर आरोप केलाय.



काय म्हटलंय दानवेंनी...? : महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे 'गेल इंडिया' ही कंपनी ५० हजार कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असं दानवेंनी म्हटलंय.


कुठले प्रकल्प परराज्यात गेले : राज्यातील टाटा एअरबस, मेडिसीन डिव्हाइस पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, वेदांत-फॉक्सकॉन, टेक्स्टाईल पार्क आणि टेक्सटाईल पार्क हे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. हे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे 'गेल इंडिया' ही कंपनी उभारणार होती. मात्र ही कंपनी आता मध्य प्रदेशमध्ये उभारली जाणार आहे. त्यामुळं राज्यात प्रकल्प किंवा उद्योग-धंदे उभारण्यास किंवा बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकारची उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी ‘महानंद’ डेअरीचं हस्तांतरण गुजरातमधील मदर डेअरीकडं देण्यात आलं. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. यानंतर आता 'गेल इंडिया' ही कंपनी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये गेल्यामुळं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. 'मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी'; दानवे यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र - Demand To Election Commissioner
  2. काय सांगता! ईव्हीएम हॅक करण्यासाठी थेट विरोधी पक्ष नेत्याकडं केली अडीच कोटींची मागणी, नेमका मॅटर काय? - Ambadas Danve
  3. सरकारी यंत्रणा म्हणजे भाजपाचे कार्यालय झाले; नकली शिवसेनेवरुन अंबादास दानवेंची पंतप्रधान मोदींवर टीका - Ambadas Danve On Pm Modi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.