ETV Bharat / sports

IND vs ENG 3rd Test : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडचा स्कोर 207/2; भारत 238 धावांनी पुढं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 9:35 AM IST

Updated : Feb 16, 2024, 10:06 PM IST

IND vs ENG 3rd Test : राजकोट इथं सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीय. भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आलाय.

IND vs ENG 3rd Test
IND vs ENG 3rd Test

राजकोट IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा दोन दिवसांचा खेळ संपला आहे. भारताचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं 2 गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. भारत सध्या 238 धावांनी पुढं आहे. बेन डकेट तसं जॅक क्रॉलीनं संघाला इंग्लडच्या संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. मात्र, अश्विननं जॅक क्रॉलीच्या रूपानं भारताला पहिली यश मिळवून दिलं. तर, बेन डकेटनं आपलं शतक पूर्ण केलं. सिराजनं ओली पोपला बाद केलं.

सामन्यांची मालिका सध्या बरोबरीत : कर्णधार रोहित शर्मा (131) व्यतिरिक्त अष्टपैलू रवींद्र जडेजाने (112) टीम इंडियासाठी शतक झळकावलं. त्याचवेळी या सामन्यात पदार्पण करणाऱ्या सरफराज खाननं 62 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाची सुरुवात 5 विकेट गमावून 326 धावा करून केली. दिवसाच्या पहिल्या अर्ध्या तासात जडेजा-कुलदीप बाद झाले, त्यानंतर ध्रुव जुरेल आणि रवी अश्विन यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला 400 च्या पुढं नेलं. अखेरीस जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज या जोडीनं 30 धावांची भागीदारी करत महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. इंग्लंडकडून मार्क वुडनं सर्वाधिक 4 बळी घेतले. 5 सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

पहिल्या दिवशी काय झालं : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आल्यानंतर संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 10 धावा करुन स्वस्तात बाद झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुभमन गिल शुन्यावर तंबूत परतला. रजत पाटीदारही काही विशेष करु शकला नाही, तो 5 धावा करुन बाद झाला. भारताचे टॉप-3 फलंदाज 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानं संघ अडचणीत साहडला होता. मात्र, यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजानं चौथ्या विकेटसाठी 204 धावांची मोठी भागीदारी करत भारतीय संघ अडचणीतून बाहेर काढलं. रोहित शर्मानंतर जडेजानंही शानदार शतक झळकावलं होतं. सध्या जडेजा नाबाद असून त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जातेय.

सरफराजनं दिला तडाखा : कर्णधार रोहित शर्मा शतकी खेळीनंतर बाद झाला, यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सरफराज खाननं पदार्पणाच्या कसोटीत अवघ्या 66 चेंडूत 62 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानं आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार मारला. सरफराज खान शानदार खेळी करुन धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथं शतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा 212 चेंडूत 110 धावा करुन नाबाद राहिला होता.

हेही वाचा :

  1. रोहित-जडेजाच्या शतकानंतर सरफराजचा अर्धशतकी तडाखा; राजकोट कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर
  2. सरफराजनं केलं संधीचं 'सोनं'; कसोटी पदार्पणातच झळकावलं आक्रमक अर्धशतक
Last Updated : Feb 16, 2024, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.