ETV Bharat / politics

पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रॅलीचं फलित काय? महायुतीला फायदा होणार? राजकीय वर्तुळात विविध चर्चा - lok sabha election

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 4:38 PM IST

PM Narendra Modi Rally in Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत शुक्रवारी सभा तर दोन दिवसांपूर्वी रोड शो केला होता. मोदींच्या सभा आणि आणि रॅलीमुळं महायुतीला फायदा होईल का? मोदींच्या सभा, रॅलीचं फलित काय? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रॅलीचं फलित काय? महायुतीला फायदा होणार? राजकीय वर्तुळात विविध चर्चा
पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रॅलीचं फलित काय? महायुतीला फायदा होणार? राजकीय वर्तुळात विविध चर्चा (ETV Bharat Reporter)

मंत्री दीपक केसरकर (ETV Bharat Reporter)

मुंबई PM Narendra Modi Rally in Mumbai : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील शिवाजी पार्क इथं सभा झाली. या सभेला महायुतीतील सर्वच पक्षातील नेते उपस्थित होते. तर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील घाटकोपर इथं पहिल्यांदाच रोड शो केला. या रोड शोला मोठी गर्दी जमली होती. परंतु, मोदींच्या रोड शोच्या दोनच दिवसांपूर्वी घाटकोपर परिसरात मोठं होर्डिंग पडल्याची दुर्घटना घडली. यात 14 लोकांचे बळी गेले. तिकडे मोदी फिरकलेसुद्धा नाहीत किंवा त्या घटनेचा त्यांच्या भाषणात कुठेच उल्लेख आढळला नाही. त्यामुळं मुंबईकरांमध्ये संतापाची लाट असून, मुंबईकरांनी नाराजीचा सूर आळवल्याचं बोललं जातय. तर दुसरीकडं मोदींच्या सभा आणि आणि रॅलीमुळं महायुतीला फायदा होईल का? मोदींच्या सभा, रॅलीचं फलित काय?

मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर : "जर मोदी मतं मागायला घाटकोपरमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे ज्या मुंबईकरांचे जीव गेले, त्या मुंबईकरांची त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. शोक सुद्धा व्यक्त का व्यक्त केला नाही?" असा संतप्त सवाल बोरिवली इथं राहणाऱ्या संदीप मोरे यांनी उपस्थित केलाय. तर "मोदींनी मुंबईत सभा, रॅली घेतली. मतं द्या म्हणून मुंबईकरांना आवाहन केलं. पण मुंबईकरांचं दुःख, समस्या त्याबद्दल जाणून घेतलं नाही. मुंबईकरांचे जीव गेले त्याबद्दल त्यांनी चकार शब्द काढलेला नाही," असं म्हणत सायन इथं राहणारे कृष्णा कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच "मुंबईमध्ये मोदी मतं मागायला येतात, परंतु जिथं दुर्घटना घडली तिथं मोदींनी भेट दिली असती तर मुंबईकरांना बरं वाटलं असतं, उलट मुंबईकरांची मोदींना सहानुभूती मिळाली असती", असं दादर इथं राहणाऱ्या अमोल हातणकर यांनी म्हटलंय. एकंदरीत काय तर घाटकोपर दुर्घटना आणि रोड शोनंतर मोदींविषयी मुंबईकरांमध्ये संतापाचं वातावरण आणि नाराजीचा सूर असल्याचं चित्र दिसून येतंय.

मोदींच्या सभांचा परिणाम 4 जूनला कळेल : शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणं झाली. यातील फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी मविआवर जोरदार निशाणा साधला तर राज ठाकरे यांनी जरी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी, मोदींच्या समोरच त्यांनी काही अटीशर्ती ठेवल्या आणि तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंतीही राज ठाकरेंनी भाषणातून केली. शेवटी मोदींनी आपल्या भाषणातून इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला आणि महायुतीच्या सहाही उमेदवारांना व्यासपीठावर उभं केलं, त्यांची नावं घेतली आणि त्यांना मतदान करण्याचं मुंबईकरांना आवाहन केलं. या महायुतीच्या उमेदवारांना मतं म्हणजे थेट मोदींच्या खात्यात मतं, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय. पण मोदींच्या या सभेला, रॅलीला आणि मत देण्याच्या आवाहनाला मुंबईकर कितपत प्रतिसाद देतील? मोदींच्या सभांचा परिणाम किंवा सभेचा फायदा झाला का, हे तर 4 जूनला मतमोजणीनंतरच कळेल.

मोदींचा प्रभाव संपला : मोदींनी महाराष्ट्रात किंबहुना मुंबईत कितीही सभा घेतल्या किंवा कितीही रॅली काढल्या तरी त्याचा महायुतीला अजिबात फायदा होणार नाही. कारण मोदींचा आता प्रभाव संपलेला आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये कोणतही नावीन्य नाही. तेच तेच बोलतात आणि याला लोकही कंटाळले आहेत. कोणताही नवीन विषय नाही. फक्त विरोधकांवर टीका करणं एवढाच त्यांचा अजेंडा आहे. म्हणून पुण्याप्रमाणं मुंबईतल्या सभेतही लोकांची गर्दी दिसली नाही. उलट कित्येक रिकाम्या खुर्च्या दिसल्या. यामुळं मोदींची सभा आणि रॅलीचा प्रभाव मतदारांवर पडणार नाही. काहीही परिणाम दिसून येणार नाही, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलंय. तसंच त्यांनी घाटकोपर पश्चिम इथं गुजराती भागात रोड शो केला. परंतु जिकडं दुर्घटना घडली. त्या घाटकोपरच्या पूर्वेला त्यांनी गेलं पाहिजे होतं. भेट द्यायला पाहिजे होती. परंतु, मोदींनी तसं न केल्यामुळं स्वाभाविकपणे मुंबईकरांना त्याचा राग आलाय आणि हा राग मतातून दिसून येईल, असंही अशोक वानखेडे यांनी म्हटलंय.

शंभर टक्के फायदा होईल : घाटकोपरची दुर्घटना ही नक्कीच मोठी आणि गंभीर आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते मंडळी घटनास्थळी पोहोचली होती. तसंच नातेवाईकांची, जखमींची मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचारपूस करुन मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केलीय. याची जबाबदारी स्थानिक पातळीवर आमची होती. मुळात मोदी मुंबईत एक तासासाठी आले होते. घाटकोपर दुर्घटना इथं जाण्यास पंतप्रधानांकडे एवढा वेळ नव्हता, त्यामुळं ते गेले नाहीत. याचा अर्थ मृतांच्या प्रती पंतप्रधानांची संवेदना नाही, असं म्हणणं चुकीचं आहे, असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तसंच मोदींची मुंबईतील सभा आणि रॅली याचा नक्कीच 100 टक्के फायदा होऊन महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास सुद्धा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय.

एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून : मोदींचा ज्या ठिकाणी रोड शो होणार, तो रस्ता बंद. कल्याणमध्ये अघोषित बंद. याच्याहून जास्त लज्जास्पद म्हणजे जिथं मोठं होर्डिंग्ज पडून मोठी दुर्घटना घडली. अनेकांचे बळी गेले त्याच ठिकाणी मोदी तुम्ही कसला तमाशा केला? कसला रोड शो केला? कशासाठी केला? लोक मरत आहेत आणि तिथंच तुम्ही रोड शो केला. एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय. तसंच मुंबईत मोदींची सभा आणि रॅलीसाठी करोडो रुपये खर्च केले. मतं मागण्यासाठी मोदी मुंबईत येतात. परंतु, त्यांच्या येण्यामुळं मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. घाटकोपर पश्चिमेला त्यांनी रॅली काढली. त्याच घाटकोपर पूर्वेला मोठी दुर्घटना घडली. पण तिकडं जायला त्यांना वेळ नाही. त्यांची विचारपूस करायला मोदींना वेळ नाही. पण सभा घेण्यास आणि मतं मागण्यास वेळ आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. मोदींनी घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी भेट न दिल्यामुळं मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे आणि मुंबईकर हा राग आपल्या मतपेटीतून व्यक्त करतील असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्राच्या अस्मितेचा बदला घ्यायचा असेल तर इंडिया आघाडीला मतदान करा - अरविंद केजरीवाल - lok sabha election
  2. "महाराष्ट्राच्या पाठीत वार केला तर,..."; बीकेसी मैदानातून उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा - lok sabha election
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.