ETV Bharat / politics

लोकसभेच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांचं मोठ वक्तव्य; म्हणाले,...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 2:33 PM IST

Shahu Maharaj on Loksabha
Shahu Maharaj on Loksabha

Shahu Maharaj on Loksabha : कोल्हापूरच्या जागेवरुन शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीची चर्चा सुरू आहे. अशातच आता शाहू महाराजांनी एक वक्तव्य केल्यानं अशा चर्चांना आणखी उधाण आलंय.

शाहू महाराज

कोल्हापूर Shahu Maharaj on Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेसंदर्भात तुम्हाला अपेक्षित असलेली 'ब्रेकिंग न्यूज' लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर ती एक जबाबदारी सुद्धा असेल, असं म्हणत शाहू महाराज छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याचे पुन्हा स्पष्ट संकेत दिले आहेत. तसंच ब्रेकिंग न्यूज सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल आणि यासाठी मला तुमचं मार्गदर्शन लागणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. कोल्हापुरात ब्रेकिंग न्यूज पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शाहू महाराज बोलत होते.



महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव चर्चेत : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराजांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं उमेदवार कोण या संदर्भात घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट न्यू पॅलेस इथं जात शाहू महाराजांची भेट घेतली. यामुळं त्यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच दोन दिवसांपूर्वी शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामुळं मला कोणतीही ऑफर नाही, मात्र येण्याची शक्यता आहे. असं म्हणत सूचक इशारा दिला होता. तर आज कोल्हापुरात 'ब्रेकिंग न्यूज' या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान त्यांनी पुन्हा सूचक इशारा देत आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.


काय म्हणाले शाहू महाराज : या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शाहू महाराज म्हणाले, "तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. मात्र ही ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातून नाहीतर दुसऱ्या गावातून येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल. ऐशोआराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे. कोल्हापूरच्या चांगल्यासाठी आणि विकासासाठी जे काही आवश्यक असेल, त्यासाठी मी नेहमी तुमच्याशी संवाद साधेन. आपण सर्वांनी मिळून काम केलं तर अनेक गोष्टी लवकर होतील. तसंच कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेलाय असं मला कळतंय. दिल्लीमध्ये काय होईल हे मला माहीत नाही. मी या दृष्टीनं कधीच दिल्लीला गेलो नाही आणि मुंबईलाही गेलो नाही. मी कोल्हापूर मध्ये शांत बसून आहे. मात्र सर्वांची अपेक्षा असेल तर तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे."

हेही वाचा :

  1. "तुतारी कायमच आणि चांगल्या वेळी वाजत असते", श्रीमंत शाहू महाराजांनी काय दिले संकेत?
  2. शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं, मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.