ETV Bharat / politics

"शरद पवार आणि राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट...", प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, राजकीय वाद पेटणार? - Prakash Ambedkar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 8:46 PM IST

Prakash Ambedkar, Sharad Pawar and Rajnath Singh
प्रकाश आंबेडकर, शरद पवार, राजनाथ सिंह (ETV BHARAT)

Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा नवीन विषय चर्चेत आणलाय. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर शंका उपस्थित करीत शरद पवार यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय का? असा सवाल उपस्थित केलाय. ते मुंबईत बोलत होते.

मुंबई Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करुन नवीन विषयाला फाटे फोडलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट जमलंय का? तसंच भाजपामधील दुसऱ्या गटासोबत शरद पवार संधान बांधत असल्याची शंका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलीय. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.


नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? : यासंदर्भात आज (7 मे) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "भाजपात सध्या दोन गट पडलेत. एकीकडं अमित शहा यांचा एक गट कार्यरत आहे, तर दुसरीकडं राजनाथ सिंह यांचा एक गट. बीसीसीआयच्या सत्ता कारणावरून अमित शहा आणि शरद पवार हे आमने-सामने आहेत. त्यामुळं शरद पवार हे राजनाथ सिंह यांच्या गटाच्या संपर्कात आहेत का? अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपाच्या जवळचा पक्ष असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. महाविकास आघाडीत सामील होताना मी स्पष्टपणे म्हटलं होतं की, भाजपसोबत जाणार नाही असा सर्व पक्षांनी मिळून ठराव करायला पाहिजे. मात्र, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी तसं करण्यास नकार दिला, त्यामुळं त्यांच्या मनात काय आहे? हे स्पष्ट होतं", असंही आंबेडकर म्हणाले.

मुंबईतील जागांचं साटं लोटं : पुढं ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना आम्ही मदत करण्याचं वचन दिलं होतं. त्यानुसार आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिला नाही. मात्र, मुंबईतील मतदारसंघांमध्ये आपण सर्व उमेदवार दिले असून आपल्याला राष्ट्रवादीकडून मदत झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती यांच्यामध्ये मुंबईतील तीन मतदारसंघांमध्ये साटं लोटं झालंय का? याचा खुलासा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं करावा. तसंच राजनाथ सिंह यांच्याबरोबर काही चर्चा झाली आहे का याचीही स्पष्टोक्ती त्यांनी करावी."

हेही वाचा -

  1. वंचितनं मुस्लिम उमेदवार दिला कारण..प्रकाश आंबेडकरांचा एआयएमआयएम थेट आरोप - Prakash Ambedkar
  2. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं खळबळ; म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपासोबत.... - Lok Sabha Election 2024
  3. 2014 नंतर 17 लाख हिंदू कुटुंबांनी नागरिकत्व का सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भागवत यांना सवाल - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.