ETV Bharat / opinion

भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान मोरारजी देसाई, महाराष्ट्र विरोधी म्हणून नेहमीच झाली संभावना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 4:28 PM IST

Morarji Desai - देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा आज जन्मदिन. त्यांची राजकीय कारकीर्द आणि वैयक्तिक जीवन किस्से कहाण्यांनी भरलं आहे. त्यांच्या राजकीय भूमिका महाराष्ट्र धार्जिण्या नव्हत्या. त्यावरुन त्यांच्यावर टीका झाली. त्याचवेळी देशाचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान अशीही त्यांची ओळख आहे. वाचूया त्यांचा रंजक प्रवास.

मोरारजी देसाई
मोरारजी देसाई

हैदराबाद Morarji Desai - भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा आज जन्मदिन. देशाचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान यापासून काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी भूमिका घेणारा महाराष्ट्रद्वेष्टा नेता इथपर्यंत मोरारजीभाई देसाई यांची राजकीय कारकीर्द अत्यंत गाजलेली आहे. एकीकडे तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून मोरारजी देसाई यांचं कौतुक होतं. त्याचवेळी महाराष्ट्र निर्मितीमध्ये मोरारजी देसाई यांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळं १०५ महाराष्ट्र वीरांना हौतात्म्य पत्करावं लागलं याची खंत सर्वच महाराष्ट्रीय मनात कायमची रुतली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेत प्र. के. अत्रेंपासून श्रीपाद अमृत डांगेंपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी रान उठवलं होतं. मात्र तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी १९५५ साली २० नोव्हेंबरला मुंबई चौपाटीवर घेतलेल्या सभेत संपूर्ण मराठी जनतेच्या रागाचा पारा चढून त्याचा कडेलोट होईल असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. याच सभेमध्ये दुसरे नेते स. का. पाटील यांनीही अशाच प्रकारच्या वक्तव्यानं मराठी जनतेचा रोष ओढवून घेतला होता. यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला अधिकच धार आली होती. त्याचं कारणही तसंच घडलं. या सभेच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलनावर गोळीबार झाला. त्यामध्ये अनेकांचा जीव गेला. शेवटी १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र साकारला. मुंबईत फ्लोरा फाउंटन भागात त्यांचं हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मोरारजी देसाई यांचं राजकारण कधीच पटलं नाही. नेहमीच गुजरात धार्जिणी भूमिका मोरारजी देसाई यांनी घेतल्यानं ते नेहमीच टीकेचे धनी ठरत राहिले.

त्या काळात महाराष्ट्र किंवा गुजरात राज्याची निर्मितीही झालेली नव्हती. मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध केला. त्यामुळे त्यांना या चळवळीचे शत्रू मानलं गेलं. मात्र कुणालाही न जुमानता संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करावीच लागली. १ मे १९६० रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ रोजी त्या काळातील भदैली या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील (आताचे गुजरात) गावात झाला. २९ फेब्रुवारीचा वाढदिवस असल्यानं चार वर्षातून एकदा आपला वाढदिवस साजरा करणारे ते नेते होते. शिक्षण घेतल्यावर 1917 मध्ये त्यांची मुंबई प्रांत नागरी सेवेत निवड झाली होती. इंग्रजांच्या काळात 1927-28 मध्ये त्यांनी गोध्रा येथे उपायुक्तपदी काम केलंय. त्यावेळी तिथे दंगल झाली होती. या दंगलीनंतर मोरारजी देसाई यांनी आपल्या नागरी सेवा पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते 1952 मध्ये मुंबईचे मुख्यमंत्री झाले. आपल्या आदर्शांना मानणाने म्हणून मोरारजी देसाई यांची ख्याती होती. मोरारजी देसाई शिवांबू अर्थात स्वमूत्रप्राषन करत असत. ते आपल्या आरोग्याचं हेच एक मोठं गुपित असल्याचं ते सांगत. त्यामुळेच ९९ वर्षे ते जगले असंही सांगण्यात येतं.

स्वातंत्र्य लढ्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मोरारजी देसाई यांना पंतप्रधान पदासाठी खूपच वाट पाहावी लागली. त्यांना संधी असूनही हे पद मिळालं नाही. शेवटी 1977 मध्ये देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं, तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते पहिले गुजराती तसंच जनता पार्टीचे पंतप्रधान होते. देसाई हे भारताचे चौथे पंतप्रधान होते. सर्वाधिक वयात पंतप्रधानपदी विराजमान होणारे देशाचे ते आतापर्यंतचे एकमेव पंतप्रधान म्हणावे लागतील. वयाच्या ८१व्या वर्षी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

राष्ट्रीय राजकारणात मोरारजी देसाई थोडे उशिरा आले कारण त्यांना राज्याच्या राजकारणात जास्त रस होता. त्यामुळेच १९५२ साली ते मुंबई राज्याचे (प्रांत) मुख्यमंत्री झाले. त्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच होता. पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांनी काम पाहिलं. त्यावेळी ते देशाचे गृहमंत्री होते.

मोरारजी देसाई यांच्या काटकसरी स्वभावाचे अनेक किस्से आहेत. मात्र यामुळे त्यांचा एकदा थोडक्यात जीव वाचला होता. तर ५ जवानांना हौतात्म्य आलं होतं. देसाई १९७७ साली पंतप्रधान असताना विमानाचा आसाम मध्ये अपघात झाला. यावेळी त्यांना मोठ्या विमानातून प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र पैसे वाचवण्यासाठी त्यांनी छोट्या विमानातून प्रवास करण्याचा हट्ट केला. शेवटी ते विमान अपघात ग्रस्त ठरले. आपत्कालीन लँडिंग विमानाच्या नोज अर्थात पुढील टोकावर करावं लागलं होतं. त्यामध्ये विमानात मागे बसलेले मोरारजी देसाई वाचले. मात्र पायलट दलातील ५ जणांना जीव गमवावा लागला होता.

भारताप्रमाणेच मोरारजी देसाई हे पाकिस्तानातही लोकप्रिय होते. भारतानं १९७४ साली पहिली अणूचाचणी केली. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनशी भारताचे संबंध ताणलेले होते. यामध्ये पुन्हा मैत्रिपूर्ण संबंधासाठी मोरारजी देसाई यांनी पुढाकार घेतला होता. पाकिस्तानने देसाई यांच्या यासंदर्भातील योगदानाची चांगलीच कदर केली. निशाण-ए-पाकिस्तान या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना भारत रत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. एकूणच भारतीय स्वातंत्र्य चळवळ महात्मा गांधी यांच्याबरोबर त्यांच्या विविध आंदोलनातील सहभाग त्यातून झालेला तुरुंगवास या सगळ्याचा सामना मोरारजी देसाई यांनी केला. पंतप्रधानपद मात्र त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरच मिळालं. त्यांची प्राणज्योत १० एप्रिल १९९५ साली मुंबईतच मालवली.

हे वाचलंत का...

  1. संघर्षात सामंजस्य निर्माण करण्यासाठीचा उपाय 'मध्यस्थी कायदा'; वाचा मध्यस्थी कायद्याची व्यापकता आणि मर्यादा
  2. PMGKAY अंतर्गत जनतेच्या कायमस्वरुपी अन्न सुरक्षेसाठी भारताचे WTO मध्ये प्रयत्न
  3. मराठी भाषा गौरव दिन विशेष - अमृतासी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य असलेल्या माय मराठीची अविट गोडी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.