ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलन चिघळलं; पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा, शंभू सीमेवर अनेक शेतकरी ताब्यात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 6:53 AM IST

Updated : Feb 13, 2024, 12:38 PM IST

Farmer Protest
Farmer Protest

Farmer Protest : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची चाहूल लागली आहे. मंगळवारपासून शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो मार्च' सुरू झाला असून, या आंदोलनात देशाच्या विविध भागातून 200 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.

नवी दिल्ली Farmer Protest : सोमवारी शेतकरी संघटनांची सरकारबरोबरची साडेपाच तासांची बैठक अनिर्णित राहिली. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच सुरू केली आहे. प्रशासनानं दिल्लीच्या सीमा सील केल्या असून, राजधानीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

शंभू सीमेवर परिस्थिती बिकट : सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र शंभू सीमेवर परिस्थिती बिकट झाली आहे. पोलिसांनी शंभू सीमेवर अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यासोबतच हरियाणाच्या अंबाला येथे शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. शेतकऱ्यांना सुमारे 300 मीटर मागे ढकलण्यात आलं, मात्र आंदोलक अजूनही दिल्लीत प्रवेश करण्यावर ठाम आहेत.

साडेपाच तासांची बैठक अनिर्णित : सोमवारी चंदीगडमध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अर्जुन मुंडा यांच्याबरोबर शेतकरी संघटनांची साडेपाच तासांची बैठक अनिर्णित राहिली. आमचा दिल्लीपर्यंतचा मोर्चा कायम राहणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एमएसपीबाबत शेतकरी अजिबात तडजोड करण्यास तयार नाहीत. सरकार आमच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी कूच करतील. 16 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.

दिल्लीत कलम 144 लागू : माहितीनुसार, 13 फेब्रुवारीच्या 'दिल्ली चलो मार्च'मध्ये सुमारे 20 हजार शेतकरी 2500 ट्रॅक्टरमधून दिल्लीला पोहोचू शकतात. हरियाणा आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात अनेक आंदोलक उपस्थित आहेत. ते दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत प्रवेश करू नये, अशा कडक सूचना दिल्ली पोलीस आणि हरियाणा पोलिसांना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं असून, 12 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत राजधानीत कलम 144 लागू राहील.

रॅली किंवा मिरवणुकीला परवानगी नाही : पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं की, या कालावधीत लोकांचं एकत्र येणं, रॅली काढणं आणि लोकांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर बंदी असेल. या आदेशानुसार राजधानी दिल्लीत कोणत्याही रॅली किंवा मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नाही. तसेच रस्ते अडवण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय दिल्लीची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॅक्टर रॅलींवरही बंदी घालण्यात आली आहे. लोकांना एकत्र येण्यास, रस्ते अडवणे, रॅली किंवा जाहीर सभा घेण्यास बंदी असेल, असं आदेशात लिहिलं आहे.

दिल्लीच्या सीमा सील : उत्तर प्रदेश आणि हरियाणाहून येणाऱ्या वाहनांचीही कडक तपासणी केली जाणार आहे. याशिवाय भडकावणाऱ्या घोषणा किंवा संदेश बोलणे, लिहिणे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पसरवणे देखील बेकायदेशीर मानलं जाईल. याशिवाय, कोणत्याही खाजगी वाहनात किंवा इमारतीत किंवा सार्वजनिक परिसरात कोणतंही ॲम्प्लीफायर किंवा लाऊडस्पीकर वापरण्यास पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बंदी असेल.

काही मुद्द्यांवर एकमत : यापूर्वी शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर एकमत झाल्याची बातमी आली होती. सरकारनं वीज कायदा 2020 रद्द करण्याचं, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आणि शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचं मान्य केल्याचा दावा केला होता.

हे वाचलंत का :

  1. पुन्हा शेतकरी आंदोलन का? काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या? जाणून घ्या सर्वकाही
Last Updated :Feb 13, 2024, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.