जायकवाडी धरण 95 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू
पैठण (औरंगाबाद) - जायकवाडी अर्थात नाथसागर धरण 95 टक्के भरल्याने दीपात्रात दहा हजार क्युसेक वेगाने आज सकाळी एक ते अठरा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नाशिक तसेच जायकवाडी धरण परिक्षेत्रात झालेल्या संततधार पाऊसाने जायकवाडी धरणात सध्या 61 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असुन जायकवाडी धरणाची टक्केवारी ही 95 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. यामुळे आज जायकवाडी धरणाचे चार गेट अर्धाफुट उचलुन 3 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडला आहे. पाण्याची आवक बघता 9432 क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती पाठबंधारे विभागाकडुन सांगण्यात आली. सध्या जायकवाडी धरणाचे 1, 8, 9, 18 क्रमांकाचे गेट अर्धा फुटवर उचलुन 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर येणाऱ्या पाण्याची आवक परिस्थिती पाहून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.