यवतमाळ - विदर्भ आणि मराठवाड्याला पैनगंगा नदी विभागते. त्यामुळे दोन्हीही राज्याच्या सीमेवरील गावाजवळ नदीचे विस्तीर्ण असे पात्र आहे. अनेक ठिकाणी नदीवर पूल नसल्याने सीमेवरील नदीतून नागरिकांना जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तराफ्याला खालून थर्माकोल लावून या नदी पात्रातून प्रवास करण्याचे दिव्य नागरिक करीत आहेत. वाटेगाव,कारखेड नदीपात्रातील हे चित्र आहे.
पूल बांधण्याची मागणी
विदर्भातील सीमेवरील जवळपास ३० ते ३५ गावांना मराठवाड्यातील हादगाव हे प्रमुख बाजारपेठ म्हणून अतिशय जवळ पडत. उलटपक्षी या सीमावर्ती गावांना तालुक्याचे ठिकाण हे जवळपास ४० किलोमीटर दूर पडते. शिवाय जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण यवतमाळ हे नांदेड पेक्षाही कितीतरी दूर आहे. त्यामुळे दैनंदिन कामासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी लोकांची धाव ही नांदेडकडे असते. यामुळे या नागरिकांना तरफ्यातून प्रवास करणे भाग पडत आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहे. नदीवर पूल बांधावा अशी या भागातले नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष देऊन मागणीची पूर्तता करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा -दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता घरपोच लसीकरणाचे केंद्र उभारा; खासदार धानोरकरांची मागणी