ETV Bharat / state

वाशिममध्ये कोरोना संसर्गात घट; खबरदारी घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

author img

By

Published : Jun 2, 2021, 10:31 AM IST

Updated : Jun 2, 2021, 1:05 PM IST

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आला आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

कोरोना
कोरोना

वाशिम - जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. संसर्ग कमी झाला असला तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजनांवर यापुढेही भर देण्यात येणार आहे. सोबतच कोरोना चाचण्यांची संख्या कमी न होऊ देता, त्या कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व खरीप हंगामाच्या अनुषंगाने १ जून रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.

वाशिममध्ये कोरोना संसर्गात घट

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी
गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध शिथिल करून सर्व दुकाने सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण संख्येत घट झाली असली तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देसाई यांनी दिल्या.


संस्थात्मक विलगीकरणावर भर
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आला आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, असेही देसाई म्हणाले. तसेच जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमाविलेल्या अनाथ बालकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पीक कर्ज वितरणाचा आढावा

खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम अधिक गतिमान करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या मोहिमेतून थेट बांधावर खते, बियाणे देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

Last Updated : Jun 2, 2021, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.