ठाणे - मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेला भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वळपाडा पाईप लाईन रस्ता हा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नादुरुस्त झाला असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने सदरचा रस्त्याचे तात्काळ सिमेंट काँक्रीटकरण करावे, अशी मागणी भिवंडी पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती विकास भोईर यांनी केली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे विकास भोईर यांनी एक निवेदना दिले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की मुंबई महापालिका क्षेत्रातील जनतेला पिण्याचे पाणी पाईपलाईनद्वारे नेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने घेतल्या आहेत. या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी तात्काळ घटनास्थळी पोहचता यावे यासाठी मुंबई पालिकेने भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते (तानसा ) अघईपर्यंत सुमारे ४० किमी. लांबीचा रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावरून अनेक गावांमधील नागरिक ये - जा करीत आहेत. मात्र भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वळपाडा या नादुरुस्त रस्त्यावरून मोटार सायकल तसेच हलकी चारचाकी वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे.
गोदाम पट्यामुळे टेंपोंची वर्दळ जास्त प्रमाणात असल्याने ठिकठिकाणी वाहने खड्यातच पडून अपघात होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच शाळा सुरू झाल्या की, विद्यार्थ्यांचे वेळेवर शाळेत न पोहचल्यामुळे शैक्षणिक नुकसान देखील होते. सर्व सामान्य स्थानिक नागरिकांनाही या खड्डेमय रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदरचा रस्ता हा लवकरात लवकर सिमेंट काँक्रिटचा तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे साकडे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर व आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना भिवंडी पंचायत समितीचे सभापती विकास अनंत भोईर यांनी एका निवेदनाद्वारे घातले आहे.