ETV Bharat / state

सोलापूर:ऊसदरावरून स्वाभिमानीचे 'रास्तारोको' आंदोलन

author img

By

Published : Nov 23, 2020, 3:10 AM IST

प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील साखर कारखाने उस गळप चालू करण्याआधीच दर जाहीर करतात. मात्र, यावर्षी कोणताही ऊस दर जाहीर न करता कारखान्यांनी ऊस गळपाचे काम सुरू केले. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

swabhimani-shetkari-sanghatna-agitation-for-sugarcane-rate-in-solapur
सोलापूर:ऊसदरावरून स्वाभिमानीचे 'रास्तारोको' आंदोलन

पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यातील एका कारखान्याने सतराशे रुपये ऊसदर जाहीर केल्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहे. सांगली, उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाला अडीच ते तीन हजार रुपये भाव जाहीर केला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी याप्रमाणे ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर, मोहोळ, माळशिरस या तालुक्यात ऊस ट्रॅक्टर वाहतूक थांबवून रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले.

विजय रणदिवे यांची प्रतिक्रिया

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा व एफआरपीची रक्कम आधार करावी, यासाठी 5 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मात्र, शेतकरी संघटना व साखर कारखानदारांची ऊस दराबाबत कोणतीही बैठक न घेता, जिल्ह्यातील एका कारखान्यांने सतराशे रुपये ऊसदर जाहीर केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही भागात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून रस्त्यावरती टायर पेटवून ऊसदराचा जाहीर निषेध स्वाभिमानीच्यावतीने करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याची केली होती मागणी-

पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पालकमंत्री या नात्याने स्वाभिमानी व साखर कारखानदारांची बैठक बोलून उसाचा दर जाहीर करावा, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटने दिले होते. कारखान्यांनी ऊसदर जाहीर न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला होता.

साखर कारखान्यांनी दोन दिवसांत ऊसदर जाहीर करावा-

यावर्षी कोरोना महामारी असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच ऊस गळपाला सुरुवात केली आहे. प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील साखर कारखाने उस गळप चालू करण्याआधीच दर जाहीर करतात. मात्र, यावर्षी कोणताही ऊस दर जाहीर न करता कारखान्यांनी ऊस गळपाचे काम सुरू केले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी दोन दिवसांत अडीच ते तीन हजार रुपये ऊसदर जाहीर न केल्यास यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.